सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत जिल्हा नियोजन समिती तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल 11 कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. याकरता अल्पमुदतीच्या तातडीच्या निविदा काढून ही प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सुरू करावी, असे आदेश देण्यात आले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी वार्ड क्रमांक 2 आणि रुग्णालयातील उपलब्ध औषधसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा चिकित्सक डॉ. युवराज करपे उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, “”जिल्हा रुग्णालयासाठी आगामी सहा महिन्यांसाठी औषधसाठा पुरेल याची तजवीज करण्यात येत आहे. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या स्थापनेपर्यंत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समिती तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय याकरिता 11 कोटी रुपयांची औषध खरेदी करण्यात येणार आहे. नियोजन समितीच्यी एकूण निधीपैकी दहा टक्के निधी या कामाकरता दिला जाणार आहे.
तसेच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संचलन आणि समन्वयासाठी तसेच तातडीच्या उपाययोजनांसाठी प्रांतांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण निवारण समिती स्थापन केली जाणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकसनासाठी सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून सर्व पहिल्या टप्प्यांमध्ये सांडपाणी निर्मूलन योजना कार्यान्वित केली जाणार आहे.” सांगलीचे स्मार्ट पीएचसीचे मॉडेल साताऱ्याने स्वीकारले आहे. हे काम डिसेंबरअखेर डीपीडीसीतून जादा निधीतून केले जाणार आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरली जाणार असून त्याचे काम टाटा कन्सल्टन्सीला देण्यात आले आहे. लवकरच ही पदे भरली जाणार असून मनुष्यबळाचा अनुशेष पूर्ण केला जाईल, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
वाढीव खाटांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना
ग्रामीण रुग्णालयामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी न राहिल्यास त्यांची तक्रार थेट जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे करा, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. जिल्हा रुग्णालयात सध्या 241 बेड आहेत. मात्र, ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य सेवेवर ताण पडत आहेत. वाढीव बेडचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देसाई यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या. तसेच वुमन्स हॉस्पिटलमधील यंत्रणा मेडिकल कॉलेजची इमारत झाल्यानंतर तिकडे स्थलांतरित होणार आहे. त्यानंतर वुमन्स हॉस्पिटलचे 100 बेड उपलब्ध होतील त्यामुळे यंत्रणेवर ताण पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयासाठी कंत्राटी तत्त्वावर आणखी काही भरती केली जाईल तसेच मेट्रो ब्लड बॅंकेची इमारत तयार असून त्याकरता प्रलंबित प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
======================