पुणे – पुण्यातील इंडस्ट्रीज आणि एसएमईना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी तसेच बॅंका आणि उद्योगातील संवाद वाढविण्यासाठी पुणे इंडस्ट्रीज ऍण्ड एसएमई समीटमध्ये चर्चा झाली. फेडरेशन ऑफ इंडियन एसएमई असोसिएशन आणि महाराष्ट्र इंडस्ट्री ऍण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे इंडस्ट्रीज ऍण्ड एसएमई समीटचे आयोजन करण्यात आले होते.
बडवे ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बडवे, बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, बॅंक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक प्रमोद बाथल, कॉंक्रोड ग्रुप ऑफ होल्डिंगचे संस्थापक जोसेफ सी. लिबास ज्युनिअर, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र सर्कलचे महाव्यवस्थापक सुखविंदर कौर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. संजय चोरडीया, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे आणि संचालक महेश साळुंखे यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत साळुंखे म्हणाले उद्योगासाठी असलेल्या सरकारी योजनांची अनेकांना माहिती नसते. ती माहिती देण्यासाठी चेंबर काम करीत आहेत. या क्षेत्रासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद आम्ही केली असून आता वेंडरला देखील कर्ज देण्यात येईल, अशी भुमिका सुखविंदर कौर यांनी मांडली. कंपनी सुरू ठेवण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करण्याची तयारी ठेवा असा सल्ला श्रीकांत बडवे यांनी दिला.
प्रमोद बाथल म्हणाले, सरकारप्रमाणे बॅंकादेखील एसएमई आणि शेतीवर लक्ष ठेऊन आहेत. या क्षेत्राची आर्थिक गरज पूर्ण करण्याचे आमचे लक्ष आहे. उद्योग क्षेत्रात चालना देण्यासाठी असा प्रकरणाचे समीट गरजेचे आहेत असे विचार जोसेफ सी. लिबास यांनी व्यक्त केले. हनुमंत गायकवाड अंगी श्रम आणि चिकाटी असेल तर छोटा व्यवसाय जगभर पोचू शकतो असे सांगीतले.
पूर्वी भारतात नावीन्य होते आणि प्रगत देशांत संधी होत्या. आता भारतातच नावीन्य आणि संधी आहेत. परदेशातील अनेक बड्या कंपन्या आता भारतात येत आहेत असे मत डॉ. संजय चोरडीया यांनी व्यक्त केले. ऑटोमोबाईल, आयटी, बायोटेक असे अनेक उद्योग पुण्यात झपाट्याने वाढत आहेत. त्यांच्या विकासासाठी आवश्यक बाबी केल्या जात आहेत असा विश्वास सुरवसे यांनी यावेळी व्यावसायिकांना दिला.