मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र महाराज आणि अंनिस यांच्यातील वादाने पूर्ण देशात गोंधळ उडाला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातही त्यांचा दिव्य दरबारवर आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या दरबारावर अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी टीका करत महाराजांनी त्यांची दिव्यशक्ती सिद्ध केली, तर ३० लाख रुपयांचं बक्षिस देईन, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले होते. दरम्यान, या सर्व वादात आता भाजपा नेते राम कदम यांनी उडी घेतली आहे.
धीरेंद्र महाराज-अंनिस वादाविषयी बोलताना राम कदम यांनी,“स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे अनेकदा विज्ञानावरही विश्वास ठेवत नाहीत, हे दुर्दैव आहे. आमच्या साधु-संतांवर टीका केल्यानंतर ते लगेच राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेस सहभागी होतात. त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन फिरताना दिसतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलनकार जी टीका करत होते, ती राहुल गांधींची स्क्रिप्ट होती का? हे सर्व काँग्रेसने ठरवून केलं होतं का? कारण काँग्रेसचा हिंदू द्वेष लपून राहिलेला नाही”, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान,“९ जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात, त्याला आव्हान दिलं होतं. हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात. याशिवाय धीरेंद्र महाराज कोणत्याही भक्ताच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवली हेही सांगण्याचा दावा करतात.
या दाव्यातील पहिल्या भागाला टेलिपथी आणि इंट्युशन म्हणतात. तसेच घरात जाऊन काहीही पाहू शकण्याच्या क्षमतेला अंतर्ज्ञान किंवा दिव्यशक्ती (क्लेरोयान्स) म्हणतात. मी दैवीशक्तीला कोणतंही आव्हान दिलं नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला आव्हान दिलं आहे,” अशी प्रतिक्रिया श्याम मानव यांनी एका वृत्तवाहिनीला दिली होती.