आज आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. धनत्रयोदशीनिमित्त ( Dhanatrayodashi ) सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग आणि द्रव्यनिधी आदींचे पूजन करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. वसुबारसे मागोमाग येणारा दिवाळी सप्ताहातील महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी.
देवदेवतांचे पूजन झाल्यावर पायसचा (खीर) नैवेद्य दाखविण्यात येतो. या दिवशी “यमदीपदान’ करण्याची पद्धत आहे. अवेळी येणाऱ्या संकटांपासून सूटका व्हावी, यासाठी “दीपदान’ करण्याची श्रद्धा आहे. व्यापारीवर्गात “धनतेरस’ या (Dhanteras) नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्यात येते, अशी पद्धत आहे. हा दिवसाला “धन्य तेरस’ वा “ध्यान तेरस’ असेसुद्धा म्हणतात.
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेम राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते.
सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश पाडला जातो. गाणी गाऊन व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्याचांदीने दीपतात. त्यामुळे यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका प्रचलित आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात.