नवी दिल्ली – ग्राहकांना जे वाहन हवे आहे ते वाहन उपलब्ध नसल्यामुळे धनतेरसच्या दिवशी फारसी वाहन विक्री झाली नसल्याचा दावा वाहन वितरकांच्या संघटनेने केला आहे.
गेल्या दहा वर्षात दिवाळीत वाहन वितरकासमोर इतकी वाईट परिस्थिती कधीच आली नव्हती असे वाहन वितरकांच्या संघटनेचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी म्हटले आहे. या संघटनेमध्ये 15,000 वितरक आहेत. परवा वाहन उत्पादकांच्या संघटनेने विक्री कमी झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. आता वाहन वितरकांच्या संघटनेनेही वाहन विक्री कमी झाल्याचे म्हटले आहे.
ग्राहकांना जे वाहन हवे आहे ते वाहन सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे उपलब्ध होत नसल्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर बरेच ग्राहक अजूनही करोनाच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. वैद्यकीय पेचप्रसंग निर्माण होईल या भीतीने बरेच ग्राहक स्वतःकडील रक्कम राखून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कारबरोबरच दुचाकीच्या विक्रीवरही परीणाम चालूच आहे. खेड्यातील लोक आजारासाठी पैसे राखून ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसायिक वाहन विक्रीत मात्र थोडीफार वाढ होत असल्याचे ते म्हणाले. बऱ्याच वाहन कंपन्यांनी धनतेरसला किती विक्री झाली याची आकडेवारी जाहीर केलेली नाही. एमजी मोटार इंडियाने सांगितले की आम्ही या दिवशी 500 वाहनांची विक्री केली. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे.