विकास समितीकडून नियोजनाचा अभाव; भाविकांचे होताहेत हाल
कर्जत – अष्टविनायकांपैकी एक असलेला कर्जत तालुक्यातील सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिर परिसरातील भक्त स्मृतिवनाची मोठी दुरवस्था झाली आहे. मंदिर परिसराचा विकास, देखभाल आणि नियंत्रण करण्यासाठी शासनाकडून विकास समितीची स्थापना करण्यात आली. मात्र ही समिती केवळ कागदावरच उरली असून विकासाच्या दृष्टीने कसलेच पाऊल उचलले जात नसल्याने भाविकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
सिद्धटेक तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. अष्टविनायकापैकी एक गणपती असल्याने येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. तालुक्यातील हे मोठे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. मात्र प्रशासनातील नियोजनाच्या अभावामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आहेत.
पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेल्या स्मृती वनात काटेरी झुडपे वाढल्याने भाविकांना विसावा घेणे मुश्किल झाले आहे. स्मृतीवन याची कसलीच देखभाल केली जात नसून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. मंदिर परिसरातच अवैध धंदे चालत असल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. प्रांताधिकारी अर्चना नष्टे या समितीच्या अध्यक्ष आहेत. सिद्धटेक या पर्यटनस्थळाचा विकास होण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे हे पर्यटनस्थळ विकासापासून वंचित राहिले आहे.