राज्यमंत्री मंडळाची इलेक्शन एक्सप्रेस
मुंबई (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते, याचा धसका राज्य सरकारने घेतला आहे. त्यापार्श्वभूमिवर राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांच्या निर्णयांचा धुमधडाका केला. एरव्ही मंगळवारी किंवा बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आज सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावत रेकॉर्डब्रेक 35 निर्णय घेतले. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत 25 निर्णय झाले होते.
बुधवारी, अनंत चतुर्दशीनंतर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत 35 निर्णय घेत विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हे निर्णय घेताना बळीराजाबरोबरच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त, कुष्ठरोग पिडितांना दिलासा देतानाच शिक्षकिय, वैद्यकीय तसेच अध्यापकीय अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मुंबईतील शुश्रुषा रूग्णालयाला 28 कोटींचे भाग भांडवल दिले जाणार असून मुंबईमध्ये 16 समर्पित व्यावसायिक न्यायालये तसेच सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र देखील स्थापन करण्यात येणार आहे.