मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात एकच गोंधळ सुरु झाला आहे. विरोधी पक्षांकडून, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका सुरू केली आहे. मात्र आता खुद्द देवेंद्र फडणवीसांवरच आरोप करण्यात येत आहेत. एकेकाळचे भाजपवासी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी फडणवीसांवर आरोप केले आहेत. अनिल गोटे यांनी परिपत्रक काढून त्यामध्ये थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा खळबळजनक आरोप केल्यानंतर आता अनिल गोटेंकडून खरमरीत शब्दांमध्ये परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांचे समर्थन करून जनतेच्या रोषाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये, म्हणून त्यांचे आकांडतांडव सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून विरोधकांनाच नव्हे, तर मासबेस असलेल्या ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसं वेठीला धरलं, अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे”, असे गोटेंनी या पत्रकात म्हटले आहे.
अनिल गोटेंनी यावेळी कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. “देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली”, असे गोटे म्हणाले आहेत.
“फडणवीस भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे. उगाच नाक वर करून आणि लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा सुद्धा विश्वास ठेवत नाही”, असं देखील या पत्रकात पुढे म्हटलं आहे.