जळगाव – जालन्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत अनेक नागरिक जखमी झाले. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली जात आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यातच आता काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. याबाबत आज जळगावमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीसांची माफी एक प्रकारे लाठीमाराचे आदेश दिल्याची कबुलीच आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार म्हणाले की, “ओबीसींचा आज जो कोटा आहे, त्यात वाटेकरी करणं हे सुद्धा एक प्रकारे ओबीसींमधील गरीबांवर अन्याय करण्यासारखं आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. हे दुर्लक्ष करण्यासारखं नाही.”
“याला पर्याय हा आहे, आज जी आरक्षणाची ५० टक्क्यांची अट आहे. त्या ५० टक्क्यांमध्ये आणखी १५ ते १६ टक्के वाढ करण्यासाठी दुरुस्ती संसदेत केंद्र सरकारनं करुन घेतली तर हे प्रश्न सुटू शकतात. तसेच ओबीसी आणि इतरांमध्ये मतभेद नकोत जर त्यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आमचा त्याला पाठिंबा नाही.”
देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठा समाजाची जाहीर माफी मागितली आहे. 2014 लाही युतीचं सरकार सत्तेत होतं. यावेळी आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाने पाच हजार आंदोलनं केली. त्यावेळी कधीच बळाचा वापर केला नाही. पण आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. लोक जखमी झाले आहेत. त्यांची मी क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर दुसरीकडे, अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत विरोधकांना चॅलेंज दिलं. आम्हा तिघांपैकी एकाने जरी गोळाबाराचे आदेश दिले असतील तर राजकारण सोडतो. पण तसं घडलं नसेल तर त्यांनी राजकारण सोडावं, असं अजित पवार म्हणाले. त्यावर शरद पवार म्हणाले, जालन्यात पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसत आहे. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला नाही”, असं शरद पवार म्हणाले.