प्रशासन कामाला लागले ः सरपंच वसुंधरा उबाळे यांची माहिती
वाघोली- वाघोलीत भेडसावणारी कचऱ्याची समस्या मुळापासून सोडविण्यासाठी वाघोली ग्रामपंचायतीसह प्रशासनाने रणशिंग फुंकले असून शुक्रवार (दि. 14) पासून घंटा गाडी नियोजन, कचरा उचलणे, डीपीआर, ओला व सुका कचरा वर्गीकरण जनजागृती करणे आदींसह विविध कार्यांच्या माध्यमातून कचरा हटविण्याचा निर्धार ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सरपंच वसुंधरा उबाळे यांनी दिली.
मागील दीड वर्षांपासून वाघोलीतील कचरा समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. कचरा समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असताना बऱ्याच अडचणींचा सामना वाघोली ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, नागरिकांना करावा लागला आहे. कचरा प्रकल्पाला जागा देण्यासाठी डीपीआर सादर करण्यास जिल्हाधिकारी यांनी देखील सांगितले असल्याने ग्रामपंचायतीमार्फत विस्तृत डीपीआर करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघोलीतील समस्येसंदर्भात बैठक घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून वाघोलीतील समस्या सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः लक्ष घातले असून कचरा व इतर समस्यांबाबत कार्यवाही करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी तात्काळ गुरुवारी (दि. 13) वाघोलीतील सोसायटीधारक, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविली होती. प्रामुख्याने कचरा व इतर समस्या सोडविण्यासाठी प्रशासन ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या मदतीने नियोजनबद्ध काम करण्यासाठी शुक्रवार (दि. 14) पासून सुरुवात करणार असल्याचे शिर्के यांनी सांगितले.
वाघोलीत दररोज निर्माण होणाऱ्या 55 टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी, स्वच्छ वाघोली चळवळ राबविण्यासाठी व कचरा समस्या मुळापासून सोडविण्यासाठी नागरिकांनी देखील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून सहकार्य करावे आणि कचरा घंटा गाड्यांमध्येच टाकावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.