Farmers Protest – शेतकऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दिल्ली चलो आंदोलन पुकारले आहे. मागील काही दिवसांपासून ते पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू आणि खनौरी या ठिकाणांवर ठाण मांडून आहेत. नुकताच खनौरीत शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. त्यामध्ये एक आंदोलक मृत्युमुखी पडला. तर, १२ पोलीस जखमी झाले. त्या घटनेनंतर शेतकरी संघटनांनी दिल्ली कूचला स्थगिती दिली. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांना आंदोलनाच्या भवितव्याविषयी प्रश्न विचारले.
आगामी निवडणुकीसाठीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागू होऊ शकते. त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर पंधेर उत्तरले, आम्हाला काही निवडणुकीचे तिकीट वाटप करायचे नाही. आम्हाला प्रचारही करायचा नाही. त्यामुळे आम्हाला आचारसंहितेची चिंता नाही. ती लागू असतानाही आंदोलन चालू ठेवण्याचा आमचा विचार आहे. पुढचे पाऊल कुठले उचलायचे याचा निर्णय आम्ही २९ फेब्रुवारीला घेणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.