पिरंगुट- येथील ग्रामपंचायतीने “स्वच्छ, हरित व सुंदर’ परिसरचा निर्धार केला आहे. पुणे येथील “वनराई’ संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, तसेच सदस्यांनी नुकतीच वनराई संस्थेला भेट देऊन देशभर सुरू असलेल्या ग्राम विकासाच्या व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याविषयीची माहिती घेतली. यावेळी पिरंगुटच्या आगामी विकासावरही सविस्तर चर्चा केली गेली. यावेळी पिरंगुटचा सर्वांगीण व शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी वनराई संस्था व ग्रामपंचायत पिरंगुट यांचे संयुक्त सहकार्य व प्रयत्नांविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
सरपंच चांगदेव पवळे व ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजने यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या चर्चा सभेत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी मार्गदर्शन करून सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे यांनी सांगितले की, पिरंगुट येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची व्याप्ती वाढवून तो आणखी चांगला करणार आहोत. गावाचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास आणि स्वच्छता करण्यासाठी तसेच राज्यस्तरावर आणि देशपातळीवर या प्रकल्पाची दखल घेतली जावी म्हणून विविध संस्थाचे सहकार्य घेतले जाणार आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणार आहोत.
यावेळी सरपंच चांगदेव पवळे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे, उपसरपंच प्रवीण कुंभार, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा पवळे, रामदास गोळे, छाया पवळे, अश्विनी निकटे, तेजस्वी उभे, विकास पवळे, लक्ष्मण निकटे, सुरेखा पवळे, सारिका गोळे, सुवर्णा नवाळे, सारिका केदारी आणि वनराई मासिकाचे कार्यकारी संपादक व प्रकल्प प्रमुख अमित वाडेकर, तसेच वनराईच्या सीएसआर उपव्यवस्थापक नम्रता शिंदे उपस्थित होते.