नवी दिल्ली – भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. पण केंद्रात सरकार आल्यानंतर भाजप ही घोषणा पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे त्यांनी हा निवडणुकीचा जुमला होता, असे मान्य करावे आणि माफी मागावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
चिराग पासवान, प्रफुल्ल पटेल, दुष्यंत चौटाला हे सर्व घराणेशाहीमध्ये येत नाहीत, पण आम्ही घराणेशाहीमध्ये येतो. त्या सर्वांची योग्यता आणि आमच्यावर घराणेशाहीचा आरोप हा आमच्यावर अन्याय आहे. त्यांचे आमदार, खासदार, मंत्री होतात. त्यांची पहिली, दुसरी, तिसरी पिढी येते. पण आमची पिढी आली, तर समस्या होते.
भाजपने आम्हाला चोर म्हटले. माझ्या बारामती मतदारसंघात येऊन नॅशनल करप्टेड पार्टी कोण असेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस असेल असे म्हटले होते. पण आता सरकारने उत्तर द्यावे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नॅशनल करप्टेड पार्टी नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला.
जम्मूत निवडणुका का नाहीत?
जम्मू-काश्मीर हे एक राज्य होते, त्याचे रुपांतर तुम्ही तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केले. त्यानंतर माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते एक वर्षात तिथे निवडणूक घेतली जाईल. आज चार वर्षे झाली आहेत तिथे निवडणूक घेण्यात आलेली नाही. या सगळ्याला मनमानी म्हणायचे नाहीतर काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.