मल्हारपेठ (वार्ताहर) – पत्रकारांचा प्रतिनिधी विधीमंडळाच्या सभागृहात हवा ही आपली योग्य मागणी आहे. एस. एम. देशमुख यांचे राज्यातील पत्रकारांसाठी मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला. पत्रकारांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाची विधानपरिषदेवर निवड होण्याची आपली मागणी योग्य असल्याचे खा. श्रीनिवास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची विधानपरिषदेवर राज्यपाल कोठ्यातून निवड व्हावी, या मागणीसाठी पाटण तालुका पत्रकारसंघाचे पदाधिकारी सदस्य यांनी खा. श्रीनिवास पाटील यांची कराड येथील निवासस्थानी निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.
खा. श्रीनिावास पाटील म्हणाले, आजपर्यंत राज्याच्या विधीमंडळात व देशाच्या संसदेत अनेक अभ्यासू पत्रकारांना संधी मिळाली. पण सर्वसामान्य पत्रकारांच्या हक्कासाठी कुणीही आवाज उठवला नाही, ही वस्तुस्थिती आहे. नागरीकांच्या हक्कासाठी नेहमीच लढणारा पत्रकार मात्र अनेक संकटाना सामोरे जाताना दिसत आहे. ग्रामीण पत्रकारांची अवस्था तर याहीपेक्षा बिकट आहे. त्यासाठी त्यांच्या तळमळीचा पत्रकार आमदार हवा.