पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या झोपडपट्टयांचे पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र, काही बिल्डरधार्जिण्या गुंडांकडून झोपडपट्टीधारकांना खोटी प्रलोभने दाखवून, समंतीच्या सह्या घेतल्या जात आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी या गावगुंडांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच शहरातील निर्वासित, भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांचा सर्वे करुन, या घटकासाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजना राबविण्याच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.11) झोपडपट्टी पुनर्वसन हक्क अधिकार महामोर्चा काढण्यात आला.
शहरातील घोषित, अघोषित, खासगी, शासकीय व निमशासकीय जागेवरील सर्व झोपडपट्टयांचा सर्व्हे कालबाह्य झाला असून, नव्याने सर्व्हे करावा. कुटुंबनिहाय सर्व्हे करून प्रत्येक कुटुंबातील प्रौढ सदस्यास नवीन घरास पात्र ठरवण्यात यावे. शहरात निर्वासित भटक्या विमुक्त समाजाचा महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत सर्व्हे करुन, त्यांना यशवंतराव मुक्त वसाहत योजने मार्फत घरे देण्यात यावीत. यासह एस.आर.ए प्रकल्पातील फ्लॅटचे क्षेत्रफळ 550 चौरस फूट करण्यात यावे. अन्यथा रमाई घरकुल आवास योजनेच्या (ग्रामीण) धर्तीवर शहरी भागातील झोपडपट्टीधारकांना त्यांच्या जागेचा सातबाराचा उतारा त्यांच्या नावावर करून आहे त्याच ठिकाणी पक्के घरांसाठी शासना मार्फत अनुदान देण्यात यावे.
महापालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुुरुवात झाली. मोरवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकमार्गे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा धडकला. या ठिकाणी अनिल जाधव, देवेंद्र तायडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
या महामोर्चात महासचिव अनिल जाधव, निरीक्षक सर्वजीत बनसोडे, महिला अध्यक्ष लता रोकडे, अनिता सावळे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, प्रवक्ता के. डी. वाघमारे, कार्याध्यक्ष सुहास देशमुख, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, संघटक बाबुराव फुलमाळी, कोषाध्यक्ष राजेश बारसागडे, राजन नायर, बिरुदेव मोटे, किरण हिंगणे आदी कार्यकर्ते व झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते.