मुंबई : झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए, सीएएविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये 35 संघटना सहभागी होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. तरी, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आजचा बंद पुकारण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात 24 जानेवारीला राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये एकूण 35 संघटना सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आंबेडकर यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका शहा मांडत आहेत, हे दुर्दैव आहे, असे ते म्हणाले आहेत.
दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत सर्व सामाजिक आर्थिक माहिती समोर येते मग एनपीआरची वेगळी गरज काय आहे? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला होता. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसी संघटना अनेक वर्षांपासून त्यांच्या जातीनिहाय गणनेची मागणी करत आहेत. त्यांची ती मागणी मान्य न करता, नॅशनल पॉप्युलेशन सेन्सस केली जात आहे. कोणतेही परिवर्तन टप्प्या टप्प्याने घडवायचे असते. मात्र मोदी सरकारने जीएसटी सारखे निर्णय एका झटक्यात केले. त्यामुळे ते अधिकारी, व्यापारी कोणालाच कळले नाही. नोटबंदी करून काळ्या पैशावर चालणारे अनेक व्यवसाय-रोजगार बंद झाले आहेत. त्याचे विपरीत परिणाम आर्थिक स्थितीवर झाले आहे.