मुंबई – राज्यात दररोज नवीन करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लाॅकडाऊन लावेल अशी शक्यता आहे. मात्र, जर लाॅकडाऊन लावला तर जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. विशेषत: गरीब व कष्टकऱ्यांचे जगणेच कठीण होणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊनला नागरिकांचा विरोध आहे.
भाजपानेही लाॅकडाऊनविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. सरकारला लाॅकडाऊन लावायचा असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा करा आणि मगच टाळेबंदी लावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
देशाच्या तुलनेत राज्याचा कारभार ठिसाळपणे सुरु आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आणि राज्यसकार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा खेळ सुरु आहे. वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लाॅकडाऊन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तुर्तास राज्यात लाॅकडाऊनसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. नागरिकांनी करोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास लाॅकडाऊनची गरज भासणार नाही. मात्र, रुग्णसंख्या आटोक्यात येतच नसेल तर लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवला असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. दोन दिवसात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी लवकरच ‘वर्क फ्राॅम होम’बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.