वडापुरी, (वार्ताहर) –भीमा नदीचे पात्र तसेच नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सध्या कोरडे पडले आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतकर्यांना पिके जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने भाटनिमगाव येथील नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कोरडा पडला आहे. या बंधार्यांच्या पाण्यावर अवलंबून असणारी चारा व इतर पिके सध्या धोक्यात आली आहेत.
यामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शिवाय आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार असल्याचे भाटनिमगाव येथील सरपंच अर्चना अजित खबाले यांनी सांगितले. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये सध्या काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भीमानदी पात्रात उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी अजित खबाले यांनी केली आहे. नदीपात्रावर इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव, भाटनिमगाव, अवसरी, सुरवड, वडापुरी, भांडगावपासून नरसिंहपूरपर्यंत गावे अवलंबून आहेत. त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडल्यास जनावरांना पिण्याचे पाणी व चार्याचा प्रश्न मिटणार असल्याचे खबाले म्हणाले.