नगर -करोना महामारीच्या संकटात ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणातील नवीन विषमता संपुष्टात आणण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. करोनामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत असताना पालकांसह विद्यार्थी देखील भरडले जात असल्याचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी म्हंटले आहे.
करोनामुळे निर्माण झालेले विदारक परिस्थिती लक्षात घेता शाळा जून महिन्यात सुरू करण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाने शैक्षणिक वर्ष 2020-21 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा, ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धती ही शाळेतील शिक्षण पद्धतीला पर्याय होऊ शकत नाही. ती पुरक होऊ शकते.
त्यामुळे शाळेतील शिक्षण सुरू झाल्याशिवाय ऑनलाइन पूरक शिक्षणाला अर्थच उरत नाही. ही बाब विचारात घेणे अत्यावश्यक आहे. ऑनलाइन पूरक शिक्षण पद्धतीचा अवलंब स्वीकारल्यास पालक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे किंवा नाही याचा विचार करणे सुद्धा अत्यावश्यक आहे. पालक आपल्या पाल्याची अन्न, वस्त्र ही मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी कसरत करत आहे.
या संकटकाळात अनेक पालकांचा रोजगार बुडणे, नोकरी जाणे, हात मजुरीची कामे न मिळणे, लघुउद्योग बंद पडणे, मोठे उद्योगातील मजूर व कर्मचाऱ्यांची कपात होणे, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात यामुळे बेरोजगारी वाढली आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासलेले पालक व मध्यमवर्गीय पालक आर्थिक विवंचनेत सापडले आहे. ऑनलाइन शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट मोबाइल डिव्हाइसेस, टॅब व त्या सोबत इंटरनेट सुविधा इत्यादी साधने आपल्या मुलांना उपलब्ध करून देणे शहरी तसेच ग्रामीण भागातील पालकांना शक्य नाही.