भोपाळ – कोणी कोणत्या जातीत जन्माला आला, यात त्याचे कर्तृत्त्व काहीच नसते असे सांगत जातींवर आधारित आरक्षण रद्द करुन आर्थिक आधारावर आरक्षण लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हजारो नागरिकांनी कडाक्याच्या थंडीत जांबोरी मैदानावर रात्रभर धरणे आंदोलन केले.
मध्य प्रदेशातील तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रथम प्राधान्य देण्यासह 22 कलमी मागण्यांबाबत करणी सेनेने राजधानीत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात मध्य प्रदेश व्यतिरिक्त हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, बिहार, दिल्लीसह अन्य राज्यांतील करणी सेनेचे हजारो कार्यकर्ते आले आहेत.
रविवारी दुपारपासून हजारो नागरिक जांबोरी मैदानावर धरणे धरुन बसले आहेत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाने त्यांना घेराव घातला आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईलची टॉर्च पेटवून ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. संघटना प्रमुख जीवनसिंग शेरपूर उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास राज्य विधानसभेचा घेराव करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही राजकारणात उतरणार, असे शेरपूर यांनी सांगितले.
करणी सेनेचे प्रदीप राजपूत म्हणाले की, या आंदोलनापूर्वी अचानक क्षत्रिय समागम आयोजित करून संपूर्ण समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक समाजातील लोक या आंदोलनात सहभागी होत आहेत. आमचे आंदोलन दडपण्यासाठी जांबोरी मैदानाभोवती शेडचे पत्रे टाकण्यात आले आहेत. मात्र, आता हे आंदोलन आम्ही प्रत्येक राज्यात नेणार आहोत