– वंदना बर्वे
आगामी लोकसभेची निवडणूक अयोध्येच्या छत्रछायेखाली लढविण्याचा भाजपचा डाव इंडिया आघाडी कशी उलटवून लावणार? हा खरा प्रश्न आहे. तर आगामी लोकसभेची ‘थिम’ही ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा झाली, तर दुसरीकडे ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी गुवाहाटीतील विश्वविख्यात कामाख्या मंदिरात पूजा-पाठ करणार आहेत. उत्तर भारतात रामाची पूजा आणि ईशान्य भारतात देवीची पूजा यास खरोखरच संयोग म्हणावा लागेल.
देशातील राजकीय पक्षांनी 18व्या लोकसभेची निवडणूक कशी लढविली जाईल? याची ‘थीम’ ठरविली आहे. भाजपच्या निवडणुकीचा प्रचार हिंदुत्व आणि धर्म या दोन गोष्टींच्या अवतीभोवती फिरताना दिसेल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्ताच्यूत करण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्ष नेमके कोणते हत्यार वापरणार? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मोदी आपल्या कमानीत ‘अयोध्यास्त्र’ घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास सज्ज आहेत. परंतु, इंडिया आघाडीकडे या ‘अयोध्यास्त्रा’ला निष्प्रभावी करण्याचा उपाय आहे काय? किंबहुना, इंडिया आघाडीने यावर उपाय शोधून काढला नाही तर अयोध्यास्त्र आपला करिश्मा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. सध्या या सर्व जागा भाजपच्या ताब्यात आहेत. परंतु, 2024च्या निवडणुकीत याची पुनरावृत्ती होणार नाही याची खास काळजी केजरीवाल यांच्याकडून घेतली जात आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीच्या प्रत्येक वॉर्डात सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला. काँग्रेसनेसुद्धा 2024 च्या निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली आहे. पक्ष संघटनेत मोठा बदल केला आहे तर लोकांना काँग्रेससोबत जोडण्याकरिता ‘डोनेशन’ मोहीम छेडली आहे. 14 जानेवारीपासून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा 14 राज्यांतील 6200 किलोमीटरचा प्रवास करून मुंबईला पोहचणार आहे.
यापूर्वी, राहुल गांधी यांनी ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ असा 3700 किमीची भारत जोडो यात्रा केली होती. पहिल्या भारत जोडो यात्रेचा परिणाम असा झाला की कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांत काँग्रेसचे सरकार आले. मात्र, अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली भाजपने चालवलेले देशव्यापी ध्रुवीकरणाचे हत्यार काँग्रेस कसे निष्फळ करणार? विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीसमोर हे मोठे आव्हान आहे. काँग्रेसने संघटनेत फेरबदल करीत उत्तर प्रदेशची जबाबदारी सरचिटणीस अविनाश पांडे यांच्याकडे सोपविली आहे. आतापर्यंत प्रियंका गांधी यूपीच्या प्रभारी होत्या. परंतु, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना यूपीच्या जबाबदारीतून मुक्त केले. प्रियंका गांधी आता देशभरात काँग्रेसचा प्रचार करतील अशी चर्चा आहे.
कारण, हिमाचल प्रदेश आणि अलीकडेच झालेल्या चार राज्यांतील निवडणुकीत त्यांच्या खूप सभा घेण्यात आल्या होत्या. सचिन पायलट यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवून छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, त्यांना राजस्थानच्या राजकारणापासून सध्यातरी दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी खजिनदार बनताच, काँग्रेससाठी किमान 138 ते 1,38,000 रुपयांपर्यंतची देणगीची यशस्वी मोहीम सुरू केली आहे.
इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत जागावाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेसने राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मोहन प्रकाश, सलमान खुर्शीद आणि मुकुल वासनिक यांची समिती नेमली आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली आणि हरियाणामध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स जवळपास उत्तर प्रदेशसारखाच राहिला आहे. या सर्व राज्यांत भाजपची सत्ता आहे. मात्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये दणदणीत विजयानंतर काँग्रेसने तेलंगणातही आपले सरकार बनविले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पराभव झाला असला तरी काँग्रेसला मिळालेल्या 40 टक्के मतांनी भाजपची झोप उडविली, हेही तेवढेच खरे.
अयोध्येतील राम मंदिरामुळे उत्तर भारतात भाजपसाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. परंतु, दक्षिणेकडील पाच राज्यांत भाजप शक्तिहिन आहे. भाजपचा कर्नाटक आणि तेलंगणात पराभव झाल्यानंतर तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक नावाचा पक्ष रालोआतून बाहेर पडला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागेल. तेलंगणात भाजपचे नऊ आमदार जिंकून आले असले तरी मतांची टक्केवारी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत घटली आहे.
शिवाय, सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार 2024 मध्ये तेलंगणात काँग्रेसला आठ जागा आणि भाजपला फक्त एक ते दोन जागा मिळणार असे दाखविण्यात आले आहे. 2019 मध्ये भाजपने याच राज्यांत चार जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला कर्नाटकात फटका बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत लोकसभेच्या एकूण 85 जागा आहेत. या राज्यातही भाजपची अवस्था दयनीय आहे. ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.
पंजाब आणि दिल्लीतील 20 जागांवरही काँग्रेस आणि आप मिळून भाजप-एनडीएला पाणी पाजू शकतात अशी चर्चा आहे. दिल्लीतील सर्व खासदार भाजपचे आहेत. मात्र यांच्यापैकी एकालाही तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी दिवसेंदिवस रालोआसाठी डोकेदुखी ठरत आहे. एका अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 2024 मध्ये रालोआला इंडिया आघाडीच्या आव्हानाचा तगडा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्र आणि बिहारमधील भाजपच्या जागा अडचणीत असल्याचे बोलले जात आहे.
राहुल गांधी आपल्या यात्रेच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, कर्जाचा वाढता बोजा, वाढती आर्थिक विषमता, वाढता द्वेष, गोदी भांडवलशाही, जातिगणना आदी प्रश्नांना लोकांच्या मनात भिनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील 85 जिल्ह्यांना भेट देणार आहे. यापूर्वी, काँग्रेसच्या स्थापना दिनी 28 डिसेंबर रोजी नागपुरात जंगी सभा झाली होती.