पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दुपारी अयोध्येतील राम जन्मभूमी येथे श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि श्रीराम नावाची ऊर्जा संपूर्ण भारतभर पसरली. गेल्या काही दिवसांपासूनच एका चैतन्यमय वातावरणाची निर्मिती संपूर्ण देशात झाली होती. तरीही प्रत्येक भारतीय रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची प्रतीक्षा करत होता. योग्य मुहूर्त साधून प्राणप्रतिष्ठा होऊन जेव्हा रामलल्लाचे दर्शन भारतासह जगातील अनेक देशातील नागरिकांना झाले तेव्हा एका वेगळ्या चैतन्यशील ऊर्जेचा सर्वत्र प्रसार झाला. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘राम’ या दोन अक्षरांना या रामलल्लाच्या मूर्तीने एक वेगळे परिमाण मिळवून दिले. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामलल्लाचे ते देखणे रूप कोट्यवधी भारतीयांनी स्वतःच्या नजरेत साठवून घेतले आणि श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा घोष केला.
राम नामामुळे निर्माण झालेली ही ऊर्जा दीर्घकाळ सर्वांना सोबत करणार आहे. अयोध्या येथे रामजन्मभूमीच्या ठिकाणी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हा निश्चितच एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण होता. भारतासारख्या रामाला परम दैवत मानणार्या देशामध्ये राम मंदिरे काही कमी नाहीत. एखाद्या गावात किंवा शहरात राम मंदिर नसले तरीही अनेकांच्या दिवसाची सुरुवात राम नामानेच होते. आधुनिक काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी गुडमॉर्निंग, गुडनाईट सारखे मेसेज लोकप्रिय होत असले तरी पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये ‘राम राम’ हेच शब्द संवादासाठी लोकप्रिय आहेत.
कोणाचे स्वागत करताना किंवा कोणाला निरोप देतानासुद्धा राम राम या दोन शब्दांचा वापर आजवर होत आला आहे. कारण प्रत्येक भारतीयाच्या अंगात ही राम नावाची ऊर्जा दीर्घकालापासून वसली आहे. हिंदू व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत राम ही दोन अक्षरे त्याची पाठ सोडत नाहीत. जगण्यात आता काही राम राहिला नाही, अशा प्रकारच्या म्हणी फक्त श्रीराम या दैवताबाबतच निर्माण होऊ शकतात. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात जर राम नसेल तर त्याला जगण्याची इच्छाच होणार नाही, इतका राम प्रत्येकाच्या रोमारोमात भिनला आहे. ज्या प्रकारे कोट्यवधी भारतीयांनी गेल्या अनेक दिवसांपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा केली होती आणि प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होत असताना हा सोहळा अनुभवला ती निश्चितच एक अद्भुत गोष्ट होती. या सर्व विषयांमध्ये असलेले राजकारण आणि मतमतांतरे बाजूला ठेवूनच या विषयाकडे पाहावे लागणार आहे.
राम नावाच्या या शब्दाने गेल्या काही दिवसांपासून जी ऊर्जा निर्माण केली आहे त्याचा प्रवाह सकारात्मक कसा होईल याची दक्षता प्रत्येकालाच घ्यावी लागेल. भारतासारख्या पर्यटनप्रेमी देशामध्ये अयोध्येसारखे आणखी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ निर्माण झाले आहे याचे आकर्षण फक्त भारतीय नागरिकांना नाही, तर परदेशी नागरिकांनाही असणार आहे. या राम मंदिराची उभारणी ज्या प्रकारे केली आहे त्यामध्ये फक्त भक्ती किंवा धर्म हा विषय समोर न येता अनेक विषयांना संकलितपणे राममंदिर प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या सर्व गोष्टी समोर येतीलच. नवीन राममंदिर ही एक सर्वांच्याच आकर्षणाची आणि भक्तीची गोष्ट होणार असेल, तर त्या स्थळाचा योग्य वापर करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. रामायण, महाभारत यासारख्या महान ग्रंथांचे किंवा इतिहासाचे योग्य संशोधन करण्यासाठी अशा प्रकारचे मंदिर प्रकल्प उपयुक्त ठरू शकतात.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या श्रीरामाचा कालखंड नेहमीच आदर्श मानला जातो आणि श्रीरामालासुद्धा पुरुषोत्तम या एका विशेषणाने संबोधित केले जाते. स्वामी विवेकानंद यांनीसुद्धा श्रीरामाचे वर्णन एकनिष्ठ, सत्यवचनी आणि ध्येयनिष्ठ या शब्दांमध्ये केले होते. तसे पाहिले तर श्रीरामाचे संपूर्ण आयुष्य समस्या आणि संकटांनी भरले होते. बालपणाचा थोडाफार सुखाचा काळ सोडल्यास वनवास आणि वनवासातील सीतेचे अपहरण आणि नंतरचे युद्ध आणि युद्धानंतर पुन्हा उत्तरकांडात सीतेचा त्याग अशा विविध प्रकारच्या समस्या आणि संकटांनीच श्रीरामाचे आयुष्य भरून गेले होते. पण या सर्व संकटांमध्येसुद्धा ज्या अविचलपणे आणि स्थिर बुद्धीने श्रीराम सर्व संकटांना सामोरे गेले त्याचे अनुकरण रामाच्या भक्तांना करता यायला हवे, हीच गोष्ट या निमित्ताने समोर येण्याची गरज आहे.
अनेक गोष्टींच्या माध्यमातून श्रीरामानी आदर्श उदाहरणे जनतेसमोर निर्माण करून ठेवली आहेत आणि रामाची भक्ती करणार्यांनी ही उदाहरणे फक्त राम कथा म्हणून सोडून देऊन चालणार नाहीत, तर ती तत्त्वे प्रत्यक्षात कशी आचरणात आणता येतील यालासुद्धा महत्त्व द्यावे लागेल. अनेक इतिहासकार आणि विचारवंत यांनी मान्य केल्याप्रमाणे श्रीराम हा काही विशिष्ट धर्माचा प्रतिनिधित्व करणारा महापुरुष नाही. कारण ज्या कालावधीमध्ये राम कथा प्रत्यक्ष घडली तेव्हा इतर कोणताच धर्म, पंथ किंवा विचारसरणी अस्तित्वात नव्हती. साहजिकच श्रीरामाला कोणत्या एका विशिष्ट धर्मामध्ये कोंडून ठेवणेसुद्धा त्याच्या आदर्शपणावर अन्याय करणेच ठरू शकते.
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि धर्मनिरपेक्ष भावनेवर आधारलेल्या देशामध्येसुद्धा सर्व धर्म आणि या धर्माचे पालन करणार्या नागरिकांनी रामाच्या आदर्शपणाचा मनापासून स्वीकार केला, तर रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही. या सोहळ्यातील राजकारण आणि धर्मकारण जरी काही काळ बाजूला ठेवले तरी एकूणच या सर्व सोहळ्यामुळे जी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे. आता अयोध्येत राम मंदिराची उभारणी करून रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असल्यामुळे भारत वर्षाच्या धार्मिक आणि अध्यात्मिक इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या निमित्ताने तयार झालेली ऊर्जा सर्वच भारतीय नागरिकांनी स्वतःच्या मनात साठवून ठेवण्याची हीच वेळ आहे.