वंदना बर्वे
यूपीच्या या निवडणुकीत कॉंग्रेस आणि बसपाला फार गृहित धरलं गेलं नाही. मात्र, चौथ्या-पाचव्या टप्प्यांत या दोन्ही पक्षांनी भाजप आणि सपाला जबरदस्त टक्कर दिली, असं म्हणतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “ड्रीम स्टेट’चा पुढचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची घटका दिवसेंदिवस जवळ येत आहे. 2024 मध्ये विजय मिळवायचा असेल तर यूपी जिंकावीच लागणार, त्यामुळे नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी स्वतःला यूपीत झोकून दिले आहे. भाजपच्या या कष्टाला मतदारांचा कौल मिळाला की नाही, हे लवकरच अर्थात 10 मार्च रोजी स्पष्ट होईल. यूपीत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांची निवडणूक पार पडली. महत्त्वाचे म्हणजे, यात फक्त उमेदवारांची अग्निपरीक्षा होती असं नव्हे; तर, बड्या-बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रायबरेली, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग, महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी यांचा अमेठी, प्रियंका गांधी, साध्वी निरंजन ज्योती, बहुचर्चित केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा, कौशल किशोर आणि नरेश अग्रवाल या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
राजनाथ सिंग लखनौहून खासदार आहेत. यामुळे लखनौतील सर्व नऊ तसेच रायबरेली आणि सीतापूरचा परिसर जिंकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. म्हणूनच राजनाथ सिंग यांनी मागील दोन महिन्यांत तुफान सभा घेतल्या होत्या. स्मृती इराणी अमेठीच्या खासदार असल्या तरी, यास लागून रायबरेलीमध्येही त्यांचा प्रभाव आहे. अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केल्यानंतर स्मृती यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. अशा स्थितीत रायबरेलीच्या पाचही जागांवर भाजपचा विजय त्यांची प्रतिमा उजळून काढू शकतो. सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेली आहे. सोनिया गांधी यांनी येथे एकदाच व्हर्च्युअल रॅली केली होती. यानंतरची सर्व जबाबदारी प्रियंका गांधी यांनीच पार पाडली. म्हणून रायबरेली आणि जवळपासच्या जागा जिंकण्याचा त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती फतेहपूरच्या खासदार आहेत. फतेहपूरच्या सर्व जागा जिंकण्याची जबाबदारी त्यांची. त्याचप्रमाणे बांदा येथील जागांची जबाबदारीही आहे. साध्वी हमीरपूरच्या रहिवासी आहेत. या भागात त्यांचा चांगला प्रभाव आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा लखीमपूर खेरीचे खासदार आहेत. मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्यामुळे ते चर्चेत आहेत. संपूर्ण देशात निषेध वर्तविल्यानंतरही केंद्र सरकारने त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. अशात या जागेवर कुणाचा विजय होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौथ्या टप्प्यांत गांधी कुटुंबालाही मोठी परीक्षा द्यावी लागली. रायबरेलीच्या सदर, उंचाहार आणि हरचंदपूर या तिन्ही मतदारसंघांत भाजप आणि सपाने कॉंग्रेसला जोरदार टक्कर दिल्याची चर्चा आहे. आता यूपीत निवडणुकीचे दोन टप्पे उरले आहेत. मात्र, चौथ्या टप्प्यांत मतदारांचा कल मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या बाजूने दिसून आला. यूपीची लढत भाजप आणि सपा या दोन पक्षात असली तरी चौथ्या टप्प्यांत बसपच्या चांगल्या जागा निघू शकतात अशी चर्चा ऐकिवात आहे. अशात, बसपा आणि कॉंग्रेसच्या मुसंडीचा फटका भाजप आणि सपा यापैकी नेमका कुणाला बसेल? या प्रश्नाने राजकीय विश्लेषकांना अस्थिर करून सोडले आहे.
लखनौत झालेल्या मतदानाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, लखनौ पश्चिम, बक्षीचा तलाव, (बीकेटी), मध्य आणि मोहनलालगंज या जागांवर निकराची लढत बघायला मिळाली. बसपाच्या उमेदवारांनी चांगली झुंज दिल्यामुळे याचा फटका अन्य पक्षांना बसू शकतो. लखनौ ग्रामीण आणि मलिहाबादमध्येही चांगली लढत दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हरदोईमध्ये भाजपची लढत सपाऐवजी बसपाशी होत आहे. संदिला, बिलग्राम मल्लवण, शहाबाद, सवैजपूर, हरदोई सदर, गोपामाऊ, सांडी आणि बालामाऊमध्ये भाजप, बसपा आणि कॉंग्रेसमध्ये लढत राहिली.
गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मायावती यांची स्तुती केली होती. बहुजन समाज पक्षाने आपली प्रासंगिकता गमावलेली नाही, असे ते म्हणाले होते. यूपीवर मायावतींची चांगली पकड आहे. जाटव व्होट बॅंक मायावतींसोबत जाईल. मुस्लीम मतंही मायावतींसोबत मोठ्या प्रमाणात जातील. याचाच अर्थ असा की, बसपाची कामगिरी उजवी होण्याची शक्यता आहे. पाचव्या टप्प्यात अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगढ, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, अयोध्या, बहराइच, श्रावस्ती आणि गोंडा या 12 जिल्ह्यांतील 61 जागांवर मतदान झाले. महत्त्वाचे म्हणजे,
सध्या या 61 जागांतील 90 टक्के जागा भाजप आणि मित्रपक्षाच्या ताब्यात आहेत. 2017 मध्ये भाजपने 51 जागा जिंकल्या होत्या. दोन जागा अपना दलाला मिळाल्या होत्या. तर सपाला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. कॉंग्रेसला एक आणि दोन जागा अपक्षांना मिळाल्या. बसपाचे मात्र खातेसुद्धा उघडले नव्हते. भाजपसाठी अयोध्या हे सर्वात महत्त्वाचे आहे. भाजपसाठी 2024 च्या निवडणुकीसाठी अयोध्या हा मोठा ब्रॅंड बनला आहे. पाचव्या टप्प्यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांची जन्मभूमी अयोध्यापासून ते त्यांची कर्मभूमी चित्रकूट आणि प्रयागराज या भागात मतदान झाले. 2017 च्या निवडणुकीत अयोध्येच्या पाचही जागांवर भाजपचा झेंडा फडकला होता. पाचव्या टप्प्यात योगी सरकारच्या अनेक दिग्गज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.