पवार मोदी भेट; दोन्ही कॉंग्रेसची बैठक : आम्ही अद्याप रालोआतच : राऊत
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचे केंद्र बनलेल्या नवी दिल्लीत आज राजकीय घडामोडींनी वेग घेतला. कॉंग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यामुळे गेले महिनाभर सुरू असलेल्या राष्ट्रपती राजवटीवर तोडगा निघून सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असे मानले जाते. या बैठकीच्या तासभर आधी शरद पवार यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी राज्यात अवकाळीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची कहाणी पंतप्रदानांना विशद केली. राष्ट्रपती राजवटीमुळे शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यात अडथळे येत असल्याने त्यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. दरम्यान, आम्ही रालोआतून बाहेर पडलो नसल्याचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा अध्यक्षांना दिल्याने त्याची चर्चा सुरू झाली.
पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, छगन भूजबळ, अजित पवार आणि नवाब मलिक उपस्थित होते. तर कॉंग्रेसच्या बाजूने अहमद पटेल, केसी वेणूगोपाल, पृथ्वीराज चौहान, बाळासाहेब थोरात, जयराम रमेश उपस्थित होते. या बैठकीत सत्तास्थापनेत कशा पध्दतीने सहभागी होता येईल, त्याचबरोबर पारंपरिक मतदार तुटणार नाही, याची चाचपणी करण्यात आली. समान किमान कार्यक्रमालाही अंतीम रूप देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
राज्यात भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या आहेत. मात्र, शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचे वाटपाची आग्रही भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षावर मुख्यमंत्रीपद देण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे त्या पक्षाने दोन्ही पक्षातील समन्वयाअभावी सरकार स्थापन करण्यात येत असल्याची सबब देत सत्ता स्थापनेचा हक्क सोडला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेला पाठींबा दण्याबाबत राज्यातील नेते उत्सुक असतानाही त्यामुळे मुस्लिम समाज दुरावला जाईल, अशा भीतीने कॉंग्रेसने सावध पावले टाकण्यास सुरवात केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये सरकारस्थापण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे. त्याचा फटका नागरिक आणि शेतकऱ्यांना बसत आहे. प्रशासन आहे की नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे पर्यायी सरकार बनवावे लागेल. त्यासंदर्भात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.
शरद पवार मोदी भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी भेट घेतली. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती शरद पवार यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी मदत लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणीदेखील केल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही नेत्यांत जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती नरेंद्र मोदी यांना दिली.
राऊतांची गुगली
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याची औपचारिक घोषणा केली नसतानाही शिवसेनेच्या राज्यसभेतील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आल्या बद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यकंय्या नायडू यांच्याकडे लेखी नाराजी व्यक्त केली.
माझी आसन व्यवस्था तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली. हे शिवसेनेचा अपमान करण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक उचललेले पाऊल आहे. हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. आम्ही रालोआतून बाहेर पडण्याची औपचारिक घोषणा केली नसताना हे पाऊल उचलण्याची गरजच काय होती, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या कृतीमुळे सभागृहाच्या औचित्याचा भंग झाला आहे. त्यामुळे आम्हाला 1/2/3 रांगेरत स्थान देऊन सभागृहाच्या परंपरेचे पालन करावे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
कॉग्रेसचे नो कॉमेंटस् कायम
शिवसेनेबरोबर राज्य स्थापन करण्याच्या मुद्द्यावर सोनिया गांधी यांनी नो कॉमेंटस असे उत्तर दिले. त्यामुळे सरकार स्थापन होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. कॉंग्रेसने शिवसेनेशी आघाडी करू नये अशी मागणी मुस्लिम समाजाकडून होत असल्याने कॉंग्रेस त्याबाबत तयार नाही, अशाही अटकळी बांधण्यात येत आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील काही मुस्लिम समाजबांधवांनी पत्र पाठवल्याची चर्चा रंगली. त्यामुळे त्याचे राजकीय तर्क वितर्क लढवण्यात येऊ लागले.