नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी पक्षाने दिल्लीच्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्यावेळी हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत दिली आहे. देशातील अन्य कोणत्याही राज्याने इतकी मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही. असा दावा दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या वतीने भाजपकडे करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यासाठी दिल्ली भाजपचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांना आधीच अडवले आहे. त्यावरून भाजपची आगपाखड सुरू असताना आम आदमी पक्षाने त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांना काय काय सवलती आणि मदत दिली याची यादीच भाजपला सादर केली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
आमच्या अन्य काही महत्वाच्या शेतकरी मदतीच्या योजना दिल्लीच्या राज्यपालांनी अडवून ठेवल्या आहेत, भाजपचीच भूमिका शेतकरी विरोधी राहिली आहे आणि त्यांच्या काळात देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे असेही आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
तीन काळ्या कृषी कायद्याच्या संबंधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले त्यावेळी आम आदमी पक्षाच्या सरकारने हे कायदे रद्द करण्याचा ठराव आपल्या विधानसभेत संमत केला. तसेच दिल्लीत आंदोलन काळात ज्या सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबााना आमच्या सरकारनेच नुकसान भरपाई दिली, अशी माहितीही आम आदमी पक्षाच्या सरकारने दिली आहे.