नवी दिल्ली – दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या आगीतून ५० हून अधिक जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाचा एक जवान हिरो ठरला आहे. राजेश शुक्ला असे त्या जवानाचे नाव असून ११ लोकांसाठी ते देवदूत ठरले आहेत. राजेश शुक्ला यांचे कौतूक दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी केले आहे.
जुन्या दिल्लीतील राणी झांसी रोडवर असलेला फिल्मस्तान सिनेमागृहाबाहेर आग लागली. या दुर्घटनेची तीव्रता वाढण्यास घटनास्थळावरील परिस्थिती, अरूंद रस्त्ते, घरांमध्ये असणारे छोटेछोटे कारखाने आणि चुकीची माहितीही कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या परिसरात आग लागली तेथील गल्लीबोळ फारच अरुंद आहेत. तसेच या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत होते. अशा परिस्थितही राजेश शुक्ला यांनी ११ लोकांचे प्राण वाचवले. यादरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
Fireman Rajesh Shukla is a real hero. He was the first fireman to entered the fire spot and he saved around 11 lives. He did his job till the end despite of his bone injuries. Salute to this brave hero. pic.twitter.com/5aebB2XLUd
— Satyendar Jain (@SatyendarJain) December 8, 2019
दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी राजेश शुक्ला यांची रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली. यानंतर जैन यांनी म्हंटले की, अग्निशमनचे जवान राजेश शुक्ला खऱ्या अर्थाने हिरो ठरले आहेत. त्यांनी आगीने घेरलेल्या इमारतीत प्रवेश करत ११ लोकांचे प्राण वाचविले. अशा बहादूर नायकाला सलाम, असे ट्विट त्यांनी केले आहे.