दिल्ली निवडणुकीसाठी भाजपाचं महाराष्ट्र प्रचार कार्ड
मुंबई: भाजपने पंतप्रधानसह पक्ष्याच्या बड्या नेत्यांना दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरविले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या यामध्ये सहभाग असून त्यांचा दिल्लीत जात प्रचार सुरु आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने यावर टीका केली. जे राज्यात चाललं नाही ते दिल्लीत काय चालणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता जेमतेम एक दिवस उरला आहे. दिल्लीच्या जनतेने भाजपाला साफ नाकारल्याचेच अनेक सर्वेक्षणांमधून समोर आले. त्यामुळे भाजपाने दिल्ली निवडणुकीचा प्रचंड धसका घेतला असून दिल्ली आता आपल्या हाती लागणार नाही असेच जणू त्यांना वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
भाजपाने आपल्या सभांची संख्या दुप्पट केली आहे, तर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची फौज दिल्लीला बोलवली आहे. याशिवाय भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि अमित शहा स्वतः या सभांना संबोधित करणार आहेत. भाजपा दिल्ली जिंकण्यासाठी आता महाराष्ट्राचं प्रचार कार्ड वापरत आहे. पण ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं ते दिल्ली कशी जिंकून देणार हा प्रश्नच आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.