– रामदास सांगळे
बेल्हे -जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढलेली असुन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसुन येत आहे. जुन्नर तालुका हा प्रवणक्षेत्रात मोडत असून यामध्ये विशेष करून आळेफाटा परिसरातील राजुरी, बोरी, जाधववाडी, साळवाडी, आळे,
वडगाव आनंद ही गावे बिबट्या प्रवण क्षेत्रात असून या ठिकाणी रात्रीचे बिबट्याचे दर्शन होत असते; परंतु दिवसाही बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसून येत आहे. गेल्याच आठवड्यात वडगाव आनंद येथील बाळासाहेब वाळुंज या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता.
तर आळे येथील आगरमळा शिवारात सकाळच्या प्रहारी शेळ्या चारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तरूणाच्या हातात दोर असलेल्या बकऱ्यावर हल्ला केला. त्यापूर्वी काही मिनिटांच्या अंतरावर बिबट्याने याच शेतकऱ्याच्या कालवडीचा फडशा पाडला होता.
ही घटना ताजी असतानाच पुन्हा पिंपरी कावळ येथील एका 80 वर्षीय ज्येष्ठावर हल्ला करून किरकोळ जखमी केले आहे. चार दिवसांपूर्वी राजुरी येथील तीन वर्षीय वेद चासकर याच्यावर हल्ला चढवला होता. येथील स्थानिक युवकांनी मोठे धाडस दाखवत या मुलाला बिबट्याच्या तोंडातून ओढून काढले. यावरून जुन्नर तालुक्यात बिबट्यांची किती दहशत आहे हे दिसून येत आहे.
सध्या तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढलेली आहे. नागरिकांनी रात्रीचे बाहेर पडताना सावधपणे बाहेर पडावे. सध्या जंगलांचे प्रमाण कमी झालेले असल्याने त्यांना त्यांचे खाद्य मिळत नसल्याने ते मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. नागरिकांनी सावधनता बाळगावी.
-योगेश घोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर
रात्रीची थ्री फेज वीज असल्याने शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. यामुळे महावितरण कंपनीने दिवसा वीज द्यावी. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचे शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागणार नाही. वन विभागाने गावोगावी जाऊन अधिक प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.
-मनोहर पटाडे, प्रगतशील शेतकरी भोरवाडी