– ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)
अरुणाचल प्रदेशमधील चीन-भारत सीमाभागातील सामाजिक जीवनात काही सकारात्मक बदल होत आहेत. या बदलांमुळे ही सीमा सुरक्षित करण्यास भारतास मदत होत आहे.
मी 1 मे पासून 11 मे पर्यंत अरुणाचल प्रदेशचा आणि अरुणाचल प्रदेशला लागलेल्या भारत-चीन सीमेचा दौरा केला. याच सीमेवर मी 1985-1988 आणि 1992-1995 मध्ये तैनात होतो. त्यानंतर अनेक वेळा मी या भागात सैनिकी दौरे केले होते. मात्र 2016 नंतरचा हा पहिला दौरा होता. त्यामुळे जमिनीवरती परिस्थिती नेमकी कशी आहे, हे बघता आले.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅंड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही राज्ये भारतासाठी महत्त्वाची आहेत. कारण चीन, म्यानमार, भूतान, नेपाळ, बांगलादेश अशा देशांच्या सीमा ज्या भागात जुळलेल्या आहेत, ज्यामुळे चीन सीमेवर चिनी आक्रमण, चिनी घुसखोरी म्यानमारच्या सीमेवर बेकायदेशीर व्यापार, शस्त्र आणि अफू, गांजा, चरसची तस्करी आणि म्यानमारच्या नागरिकांची भारतामध्ये घुसखोरी आणि बांगलादेश सीमेवरती बांगलादेशी घुसखोरी ही नेहमीच सुरू असते.
म्यानमारच्या सीमेवर घनदाट जंगल असल्यामुळे त्या सीमेचे रक्षण करणे सोपे नाही. याशिवाय या सीमेवरती तारेचे कुंपण पण लावले गेलेले नाही कारण ते लावणे अत्यंत खर्चाचे पडेल. बांगलादेशी घुसखोरी जग जाहीर आहे आणि आज भारतामध्ये पाच ते सहा कोटी बांगलादेशी घुसलेले असावेत, यामुळे तो ईशान्य भारत किती महत्त्वाचा असेल, याची कुणालाही सहज कल्पना यावी.
सामरिकदृष्ट्या आणि संरक्षणाच्या बाबतीत एक असा दृष्टिकोन होता की जर ईशान्य भारताची प्रगती झाली तर चीन अरुणाचल प्रदेशवरती हल्ला करून, अरुणाचल प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न करेल. कारण अरुणाचल प्रदेशला चीन “साउथ तिबेट’ म्हणजे चीनचा एक हिस्सा समजतो. चिनी सैन्याने जारी केलेल्या संरक्षणाच्या व्हाइट पेपरप्रमाणे पुढच्या काही वर्षांत चीन पाच मोठ्या लढाया आपल्या शत्रूंशी लढणार आहे, ज्या मधली एक लढाई आहे साउथ तिबेटची म्हणजे अरुणाचल प्रदेशवर आक्रमण करण्याची.
पूर्वी असे मानले जायचे की जर चीनला भारतावर आक्रमण करायचे असेल तर चीनला कमीत कमी दोन ते तीन वर्षे सैन्य पुढे आणण्याची तयारी करावी लागेल. मात्र आता तशी परिस्थिती नाही. सीमेपर्यंत बांधल्या गेलेल्या रस्त्यांमुळे चीन काही महिन्यांतच सैन्याची जमवाजमव करून आक्रमण करू शकतो. आपल्या सीमेचे रक्षण करण्याची क्षमता भारतीय सैन्याकडेसुद्धा असणे गरजेचे आहे आणि याकरता महत्त्वाचे पैलू आहेत रस्ते, वेगवेगळ्या नद्यांवरती पूल, रेल्वे लाइन्स. मात्र डोंगराळ भागामध्ये रस्ते बांधणे अनेक कारणांमुळे अतिशय वेळ खाऊ काम आहे. खूप पाऊस पडत असल्यामुळे रस्ते बांधायला वेळ कमी मिळतो.
याशिवाय पुरेशा प्रमाणामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान या भागात वापरता येत नाही. मजुरांची कमी असते. रस्ते बांधण्याकरता लागणारी जमीन मिळवण्यामध्ये फार वेळ जातो. अनेक नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे रस्ते बांधणे हे एक बिकट काम आहे. या भागातील आदिवासी जनतेकरता प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स लागू नाही. अनेक ठिकाणी कर चुकवण्याकरता वेगवेगळे उद्योगधंदे, दुकानेही तिथल्या लोकल जनतेच्या नावावर उघडले जातात. अतिशय चांगल्या रस्त्यांमुळे बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाममधील शेतीमाल आता अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशमधील अननस, संत्री यांना आसामच्या शहरांमध्ये चांगला भाव मिळत आहे. याचा फायदा अर्थातच आम जनतेला होत आहे.
अरुणाचल प्रदेशमधील बहुतेक जनता आता दिब्रुगड आणि मोठ्या शहरांमध्ये आरोग्य समस्यांकरता जात आहे, जो प्रवास केवळ चार तासांमध्ये केला जाऊ शकतो.अनेक परिवार आपल्या फोर व्हीलरचा वापर हा पर्यटन व्यवसायाकरता करत आहे. हा व्यवसाय सियांग, सियोम, सुबान सिरी खोऱ्यांमध्ये जोरात सुरू आहे. रस्ते अजून चांगले झाल्यास पर्यटन व्यवसाय हा इतर लोहित सरली हुरी या खोऱ्यांमध्येसुद्धा सुरू होऊ शकेल.
सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सीमावरती भागामध्ये व्हायब्रंट व्हिलेजेस म्हणजे मॉडेल व्हिलेजेस तयार करत आहे. ज्यामुळे त्या भागात असलेली आपली लोकसंख्या ही वाढेल आणि त्यामुळे ही जनता सीमा भागात भारतीय सैन्याचे डोळे आणि कान म्हणून काम करतील. याचबरोबर सीमाभागात पर्यटन वाढले तर लोकांना तिथे रोजगार उपलब्ध होईल. होम स्टे हा प्रकार बऱ्यापैकी काम करत आहे, ज्यामुळे सीमाभागातल्या लोकांच्या प्राप्तीमध्ये भर पडत आहे.