नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून देशात पसरत असलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. ही निदर्शने खूप निराशाजनक आहेत. ती आपल्या तत्वांच्या विरोधात आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी ट्विटची मालिका करत आपल्या भावना व्यक्त केल्या सार्वजनिक मालमत्तांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे व्यथीत होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाद, चर्चा आणि शांतता लोकशाही आवश्यक आहेत. मात्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका. जनजीवन विस्कळीत करू नका. संसदेत सुधारित नागरिकत्वब कायदा मंजूर झाला आहे. त्याला मोठा राजकीय पाठींबा मिळाला आहे. विविध राजकीय पक्षांनी त्याचे समर्थन केले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या कायद्यामुळे भारतातील कोणत्याही धर्माच्या नागरिकाचे नागरिकत्व धोक्यात येणार नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका. देशाच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन काम करूयात. कोणत्याही पूर्वग्रहदुषित संघटनांना समाजात फूट पाडू देऊ नका, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
दरम्यान, जामिया मिलिया उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा देशभरात निषेध होत आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या पोलिस कारवाईचा निषेध केला आहे. कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत पोलिस कारवाईचा निषेध केला आहे. विद्यापीठात पोलिस कसे घुसु शकतात? विद्यापीठ प्रशासनाने नकार देऊनही पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून कशी शिरजोरी केली?असे सवाल या नेत्यांनी केले आहेत.