नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रविवारी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) मध्ये खळबळ उडाली होती.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेकडो विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे. लखनौच्या नदवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या निषेधामुळे देशातील विविध भागातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. देशात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू आहे. त्याचबरोबर संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू केल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश, सहारनपूर, बरेली, अलीगड,
बुलंदशहर, कासगंजसह इतर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कलम १४४ चे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशही सरकारने दिले आहे. सहारनपूर, अलिगड आणि मेरठमध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. इथल्या प्रशासनालाही सतर्क राहण्यास सांगितले आहे.
आज (सोमवार) सकाळी लखनौच्या नदवतुल उलेमा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध केला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांवर दगडफेक केली. मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसरातून बाहेर जाऊ दिले नाही.
उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ.पी. सिंह म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या एका गटाने आज सकाळी नदवतुल उलेमा येथील निदर्शने करीत महाविद्यालय परिसरातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पोलिसांनी कॅम्पसबाहेर येऊ दिले नाही. यावर विद्यार्थ्यांनी कॅम्पसच्या आतून दगडफेक केली. “दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर करून विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.