महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय मंत्रिमंडळाचा अद्यापही विस्तार होत नसल्याने या दोघांवर टीकेचे वार होत असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्या काही नेत्यांनी ज्याप्रकारे विविध प्रकारची विधाने करायला सुरुवात केली आहे, त्यामुळेसुद्धा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
विशेषत: एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून काम करणारे कोकणातील नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत केलेल्या विधानांमुळे वाद वाढणार आहेत. केसरकर यांनी राणे यांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर शिंदे यांनी त्यांचे कान टोचल्यामुळे यापुढे राणे यांचे नाव घेणार नाही, अशी घोषणा केसरकर यांनी केली असली तरी केसरकर यांच्या विधानाला उत्तर देताना राणे यांच्या पुत्राने आमच्याकडे ड्रायव्हरची जागा खाली असून तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही नोकरी करू शकता, अशा प्रकारचा टोला केसरकर यांना लगावल्याने वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
खरेतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर असताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या विधानांमुळे हे सरकार अडचणीत आले आणि त्यांना सत्ता गमवावी लागली, अशा प्रकारची टीका केली जात असतानाच आता नव्या सरकारचे प्रवक्ते असलेले केसरकरसुद्धा अशी विधाने करताना काळजी घेत नाहीत, असेच दिसते. एकमेकांच्या सहकार्याने जेव्हा सरकार स्थापन झालेले असते तेव्हा त्या पक्षांनी एकमेकांच्या भावनांचीसुद्धा जपणूक करायची असती. या साध्या धोरणाचा विसर पडला तर अडचणी वाढू शकतात. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही आगामी कालावधीमध्ये देशात फक्त भाजप अस्तित्वात राहील आणि सर्वच प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व राहणार नाही, असे विधान भाजपाच्या राष्ट्रीय व्यासपीठावरून केले होते. पण हे विधान करताना त्यांना महाराष्ट्रामध्ये भाजप आता शिवसेनेसोबत सत्तेत असल्याचा विसर पडला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने खुलासा करून जे. पी. नड्डा यांचे हे विधान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी होते, असा खुलासा करावा लागला.
गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोणीही ईडीच्या भीतीने आमच्या पक्षात येऊ नये अशा प्रकारचे विधान केले होते. जे एक प्रकारे भाजपलाही अडचणीत आणणारे होते. कारण त्यावेळी मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील होण्याच्या वाटेवर होते आणि त्यांनी थेटपणे मला ईडीचा त्रास होत असल्यानेच मी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याचे सांगितले होते. एकनाथ शिंदे यांनी ईडीच्या भीतीने कोणी आमच्याकडे येऊ नये, असे सांगितले तेव्हा आपोआपच भाजपाची यंत्रणा ईडीसारख्या तपास यंत्रणांचा वापर करत असल्याची बाब मान्य करण्यासारखे होते. त्यामुळे त्यानंतर एकनाथ शिंदे यांनाही खुलासा करावा लागला.
साधारण दीड महिन्यापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला तेव्हा कोणत्यातरी कारणाने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना अतिशय चुकीचे शब्द वापरले होते. तेव्हाही केसरकर यांनी आक्षेप घेऊन भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना संयम बाळगावा अशी सूचना केली होती. पण तोच संयम त्यांना नारायण राणे यांच्यावर टीका करताना बाळगता आला नाही. कोकणातील केसरकर आणि राणे यांच्यातील संघर्ष सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे जेव्हा केसरकर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले तेव्हा कोकणामधील राजकारण कोणते वळण घेणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे वाद-विवाद निर्माण झालेच. आता केसरकर यांनी सारवासारव करून मी पूर्वीचे सगळे विसरायला तयार आहे, राणे यांच्याबाबतीत कोणतेही विधान करणार नाही, अशी भूमिका घेतली घेतली असली तरी स्थानिक राजकारणात विचार करता केसरकर किंवा राणे या दोघांसाठीही वाचाळ विधाने अडचणी निर्माण करणारी ठरणार आहेत.
एखाद्या व्यासपीठावरून बोलताना किंवा पत्रकारांशी बोलताना केवळ टाळ्याखाऊ विधाने करण्याच्या नादात अनेकदा अनेकांची जीभ घसरते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका विधानामुळे झालेला गोंधळ तर ताजाच आहे. भाजपच्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापले. खरेतर कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली असते त्यांना समय सूचकता बाळगूनच हे काम करावे लागते. कारण प्रवक्त्याला नेहमी पत्रकारांचा सामना करावा लागतो आणि पत्रकार नेहमीच नेत्यांच्या तोंडून काहीतरी मसालेदार बाहेर पडेल याबाबत शोध घेत असतात. आधुनिक टीव्ही पत्रकारितेच्या जमान्यात “मी तसं बोललोच नव्हतो’, असे कोणीही म्हणू शकत नाही. कारण अनेक कॅमेऱ्यांनी अशी विधाने रेकॉर्ड केलेली असतात. सध्याच्या व्यावसायिक आणि व्यवस्थापन यावर आधारित राजकारणामध्ये एखाद्या विषयावर पक्षाच्या प्रवक्त्यांनी कोणती भूमिका घ्यायची याबाबतचे आदेश आणि माहिती सर्वांना पाठवण्यात आलेली असते; पण प्रवक्ते या माहितीकडे दुर्लक्ष करून स्वतःचे वैयक्तिक मत मांडण्याचा नादात अडचणीत येतात आणि पक्षालाही अडचणीत आणतात.
महाराष्ट्रासारख्या सत्तेच्या प्रयोगात सामील झालेल्या सर्वच पक्षांनी काळजी घेण्याची गरज असते. विद्यमान सरकारसमोर आधीच अनेक अडचणी असताना प्रवक्त्यांच्या बोलण्यामुळे किंवा इतर काही नेत्यांच्या विधानांमुळे ही युती अडचणीत येणार नाही याची काळजी आता संबंधित पक्षाच्या मुख्य नेत्यांना घ्यावी लागणार आहे. प्रवक्त्यामुळेच उद्धव ठाकरे सरकार पडले असा जर दावा केला जात असेल तर तसाच आरोप आपल्यावरही केला जाऊ नये, याची दक्षता सर्व प्रवक्त्यांनी घ्यायला हवी.