नवी दिल्ली – इयत्ता 12 वीच्या अद्याप प्रलंबित असलेल्या परीक्षांबाबत आज शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही. या परीक्षेबाबतचे प्रस्ताव राज्य सरकारांकडून 25 मेपर्यंत मागवण्यात आले आहेत. त्याच्या आधारे लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार आहे.
इयत्ता 12 वीची प्रलंबित परीक्षा आणि त्यानंतरच्या प्रवेश परीक्षा करोनाच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये खूप महत्त्वाच्या सूचना मिळाल्या असून, तपशीलवार सूचना पाठवण्याची विनंती आपण राज्य सरकारांना केली असल्याचे निशंक यांनी सांगितले.
त्या सूचनांच्या आधारे सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल आणि परीक्षांबाबतची विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनातील अनिश्चितता लवकरात लवकर दूर केली जाईल, असे निशंक यांनी बैठकीनंतर सांगितले. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची सुरक्षितता आणि भविष्य हे आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
दोन तास चाललेली ही बैठक संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे हे या बैठकीस उपस्थित होते. त्यांच्याशिवाय काही राज्यांचे शिक्षणमंत्री आणि सचिवही या बैठकीला दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाले होते.