सातारा – करोनाला रोखण्यासाठी लिरू असलेल्या लॉक डाऊनमुळे धार्मिक कार्यक्रम, लग्नसोहळे बंद आहेत. या बंदीचा फटका बॅंडवाले, बेंजो पार्ट्याचे मालक यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. लाखो रुपये गुंतवणूक करूनही व्यवसाय अडचणीत आल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. बॅंडवाले, बेंजो पार्ट्याचे मालक, कलाकारांना सरकारने अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे आदी कार्यक्रमांवर बंदी आहे. ऐन लग्नसराईच्या कालावधीत राज्यातील लाखो बॅंड, बेंजो व वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची तर मालकांवर कर्जबाजारीपणाची वेळ येऊन ठेपली आहे. गावच्या देवापासून ते देवस्थानच्या यात्रा, पारायणे, उत्सवाचे कार्यक्रमही बंद आहेत. विवाहसोहळ्यात वाजंत्री ,बॅंडबाजा व बेंजो यांना मोठया लव्याजम्यासह मागणी असते.
मात्र, लॉकडाऊनच्या काळात ठरलेल्या तारखाही रद्द झाल्या. महाराष्ट्रात आज ढोलताशा, लेझीम, ढोलपथक, गाडीघोड्यासह लाखो रुपयांचे भांडवल गुंतवून उभे राहिलेले बॅंडपथक, पिपाणी, व वाजत्र्यांबरोबर तुतारीवाल्यावर संकट कोसळले आहे. कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिथयश बॅंडमालक आपल्या 25 ते 30 लोकांच्या लवाजम्यासह आपल्या बॅंड पथकाला सांभाळण्यासाठी कर्जबाजारी होऊन उदरनिर्वाह करत आहेत. कलावंत व अनेक ठिकाणी हजारो बॅंडमालक असेच जीवन जगत आहेत. महाराष्ट्रात अंदाजे सतरा ते अठरा लाख वाजंत्री व बेंजो, ब्राससबॅंड कलावंत गावातील उत्सवात, यात्रा, मिरवणुकीत अगर सर्वात मोठी आगाऊ बुकिंग असलेल्या लग्नसराईच्या दरम्यान रस्त्यांच्या दुतर्फा शोभा वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात.
त्यांचे मालक आज त्यांना आगाऊ पैसे देऊन आलेल्या बंदीमुळे पुरते मेटाकुटीला आले आहेत, असे व्यावसायिक अशोकराव जाधव यांनी सांगितले. कलावंतांना जगविताना शासनाने या मालकांना पण खास अनुदान द्यावे. वयोवृद्ध कलावंतांची रखडलेली पेन्शन त्वरित देण्याची मागणी बेंजो संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब माने, उपाध्यक्ष बबन जाधव आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.