मुंबई – करोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धांना फटका बसलेला असताना हा तोटा भरून काढण्यासाठी बीसीसीआय एकाच वेळी दोन संघ मैदानात उतरविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एक संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील दुसरा संघ इंग्लंडशी मालिका खेळेल.
तसेही एकदिवसीय व टी-20 सामन्यांसाठी अनेक खेळाडू निवडले जातात व कसोटीसाठी ठरवीक खेळाडूंचीच निवड होते. त्यातच जर कोणत्याही दोन संघातील सामना असताना एक संघ भारताचा असेल तर जाहिराती, थेट प्रक्षेपण व प्रायोजकांकडून प्रचंड पैसा मिळतो ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेण्याचे बीसीसीआयने निश्चित केले आहे. करोनामुळे आयपीएल स्थगित करावी लागल्याने जवळपास 4 हजार कोटींचा फटका बसणार आहे.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांनाही तोटा होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अन्य संघाशी मालिका खेळण्यापेक्षा भारताविरुद्ध खेळ झाला तरच तोटा लवकरात लवकर भरून निघतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे बीसीसीआय एकाच वेळी दोन संघ मैदानात उतरवणार आहे. एक संघ कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळेल तर, दुसरा संघ राहुलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे.
मोसमाची सुरुवात मुश्ताक अली स्पर्धेने…
करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर भारतीय क्रिकेटच्या मोसमाची सुरुवात आंतरराष्ट्रीय स्पर्धेने नव्हे तर देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेने होणार आहे. दरवर्षी ही स्पर्धा देशातील पावसाळा संपल्यावर सुरु होते. यंदा देखील याच स्पर्धेने मोसमाचा प्रारंभ होणार असून त्यात आंतरराष्ट्रीय संघातील कोहलीसह सर्व खेळाडू सहभागी होणार आहेत. देशात लॉकडाऊन केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून घरातच राहावे लागल्याने आता किमान मुश्ताक अली स्पर्धेतून ते सराव करणार आहे.