नवी दिल्ली – देशातील जवळजवळ 50 टक्के शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा आहे. साधारणपणे दरडोई कर्ज 74 हजार रुपये असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने या संदर्भात सर्वेक्षण केले आहे.
या संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी एकूण घेतलेल्या कर्जापैकी केवळ 69 टक्के कर्ज बॅंका, सहकारी संस्था इत्यादी औपचारिक क्षेत्रातून घेण्यात आले आहे. 20 टक्क्यापेक्षा जास्त कर्ज सावकाराकडून घेण्यात आले असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकरी कुटूंबाचे वर्षाला साधारणपणे उत्पन्न केवळ 10 हजार 218 रुपये आहे. देशात शेतकऱ्यांची संख्या साधारणपणे 9.3 कोटी इतकी आहे. त्यामध्ये ओबीसी शेतकरी 45 टक्के, मागासवर्गीय शेतकरी 15टक्के, विमुक्त जमातीतील शेतकरी 14 टक्के, इतर 24 टक्के आहेत.
फक्त 0.2 टक्के शेतकऱ्याकडे 10 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे. 83.5टक्के शेतकऱ्याकडे एक हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना औपचारिक क्षेत्रातून कर्जपुरवठा वाढण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.