नवी दिल्ली – बऱ्याच उपाययोजना करूनही उत्सवाच्या काळात खाद्य तेलाचे दर जास्त आहेत. त्यामुळे घाऊक व्यापारी खाद्यतेलाची साठेबाजी करणार नाहीत याकडे राज्यांनी लक्ष द्यावे अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
त्याचबरोबर दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या दर्शनी भागात खाद्यतेलाच्या उपलब्धतेची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र सध्यातरी केंद्र सरकारचा किमान विक्री किंमत ठरविण्याचा किंवा दुकानदारावर साठ्याची मर्यादा घालण्याचा विचार नसल्याचे सांगितले.
आतापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे खाद्य तेलाच्या किमती आवाक्यात येण्याची शक्यता आहे. जर त्या आल्या नाहीत तर आणखी काय उपाययोजना कराव्यात याचा पर्यायी आराखडा तयार ठेवण्यात आला आहे.
खरीपाचे पीक लवकरच बाजारात येणार आहे. जागतिक पातळीवर खाद्य तेलाच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे आगामी काही काळात खाद्य तेलाच्या किमती नियंत्रणात येतील असे केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडे यांनी सांगितले. मात्र खाद्य तेलाचे दर नियंत्रणात राहण्यासाठी देशात तेलबियांचे उत्पादन वाढले पाहिजे असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या मदतीने या दृष्टीकोनातून प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले.