अहमदाबाद – गुजरातच्या मोरबी येथे रविवारी झालेल्या पूल दुर्घटना प्रकरणी पुलाच्या दुरूस्तीचे काम करणाऱ्या ओरेवा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत मरण पावलेल्यांची संख्या आता 142 पर्यंत पोहोचली आहे.
राजकोटचे पोलीस महानिरिक्षक अशोक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी केल्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडल्यानंतर संबंधित कंपनीचे सगळेच वरिष्ठ अधिकारी फरार झाले असून कनिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली आहे.
पुलाचे फिटनेस सर्टिफिकेट घेण्यापूर्वीच पूल लोकांसाठी खुला करण्यात आला यासह अनेक त्रुटींचा ठपका ओरेवा कंपनीवर ठेवण्यात आला आहे. न्यायवैद्यक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिशांच्या काळातील या पुलाची क्षमता केवळ 100 लोकांचा बोजा सहन करण्याची होती. मात्र दुर्घटना घडली तेव्हा त्यापेक्षा पाच पट अधिक नागरिक पुलावर उपस्थित होते.
दरम्यान, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा झुलता पूल कोसळला तेव्हा पुलावर महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय होती.