नवी दिल्ली :- दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी काही चित्त्यांचा मृत्यू होण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. नामिबियातून कुनो अभयारण्यामध्ये सोडण्यात आलेल्या चित्त्यांपैकी 40 टक्के चित्त्यांचा एक वर्षाच्या आत मृत्यू होणे, हे काही चांगले चित्र नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
केंद्र सरकारने चित्त्यांचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवू नये आणि या चित्त्यांना अन्य अभयारण्यांमध्ये हलवण्याच्या शक्यतांचा विचार करावा, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
चित्त्यांच्या मृत्यूसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्या. बी.आर.गवई, न्या. जे.बी. पार्डीवाला आणि न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांनी चित्त्यांचा मृत्यू आणि ते रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
चित्त्यांसाठी वातावरण पोषक नाही, का अन्य काही कारणे आहेत? गेल्या आठवड्यात आणखीन 2 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. या चित्त्यांना अन्य अभययारण्यांमध्ये हलवण्याचा विचार का केला जात नाही? या विषयाला प्रतिष्ठेचा मुद्दा का केले जात आहे? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
अधिक चित्त्यांचे मृत्यू रोखण्यासाठी सरकारकडून प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असून त्याची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात येईल, असे सरकारच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले.