जीव मुठीत धरून प्रवास : महावितरणचेही दुर्लक्ष
भिगवण- पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भिगवण गावातील काम करीत असताना पश्चिम बाजुची टेकडी फोडण्यात आली होती. टेकडी फोडल्यामुळे त्या ठिकाणी भुस्सखलनाचा धोका असून व टेकडीवर उच्च दाबाने विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचे जाळे आहे. यावर्षी ऑक्टोंबरमध्ये विक्रमी पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी भूस्सखलानाचा धोका निमार्ण झाला आहे. भूस्सखलन झाल्यास टेकडीवर असलेल्या विद्युत तारा थेट राष्ट्रीय महामार्वावर पडण्याचा धोका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करीत असताना भिगवण, मदनवाडी, पोंधवडी परिसरातील गावांमध्ये अनेक चुका झाल्याचे लक्षात येत आहे.
ठेकेदार कंपनीच्या चुकांचा फटका सध्या सामान्य नागरिकांना बसत असल्यामुळे नागरिकांमध्ये महामार्गाच्या कामाबाबत असंतोष आहे. भिगवण शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असताना पश्चिम बाजुची टेकडी फोडण्यात आली. फोडलेल्या टेकडीच्या बाजुच्या उतारावरील पुरेसा मुरूम न काढता सुमारे 50 ते 60 फलट उंच भाग राष्ट्रीय मार्गाच्या पश्चिम बाजुस सुळक्यासारखा उभा आहे. हा भाग ढिसूळ झाला आहे. याठिकाणी भूस्सखलनाचा धोका होऊ शकतो. फोडलेल्या टेकडीवर उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा आहेत. त्यामुळे किरकोळ भूस्सखलन जरी झाले तरी हा विद्युत खांब व तारा थेट महामागार्वर येऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
भूस्सखलन व त्यानंतरचा धोका विचारात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्रशासन योग्य उपाययोजना करणार का, असा सवाल भिगवणकर उपस्थित करीत आहेत. महावितरण कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांनी याबाबत तोडगा काढण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते संपत बंडगर म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना डोंगर कोरताना चुका झाल्याने सामान्य नागरिकांच्या जिवितास धोका आहे तसेच टेकडीवर असलेल्या विद्युत तारा थेट राष्ट्रीय महामार्गावर पडू नये याचीही काळजी महामार्ग प्रशासनाने घ्यावी.
- भिगवण शहराच्या पश्चिम बाजुला राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण करीत असताना डोंगर फोडण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग व महावितरण कंपनीस कळविले आहे.
– वंदना शेलार, सरपंच, भिगवण.