सातारा -जिल्हा परिषदेत आतापर्यंत तीन करोनाबाधित आढळूनही कर्मचाऱ्यांची बेफिकिरी दिसून येत आहे. करोनाचे गांभीर्यच नसल्याने अनेक कर्मचारी विनामास्क फिरताना आढळतात. सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासन आता मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहे.
जिल्हा परिषद, कराड व वाई पंचायत समितीत करोनाबाधित आढळल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट होती. जिल्हा परिषदेत दोन करोनाबाधित आढळल्यानंतर सलग चार दिवस जिल्हा परिषद लॉकडाऊन केली होती. त्यानंतर काही दिवस कर्मचाऱ्यांना करोनाचे गांभीर्य वाटले. वाढती गर्दी रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पावले उचलली. कार्यालयात चेहऱ्यावर मास्क वापरणे बंधनकारक केले.
सर्वांना ओळखपत्र बंधनकारक केले. काही दिवस याची अंमलबजावणी झाली. नंतर मात्र दुर्लक्ष झाले. गेल्या काही दिवसांमध्ये बदल्यांची प्रक्रिया व अन्य कारणांमुळे जिल्हा परिषद कार्यालयात गर्दी वाढली. प्रत्येक विभागप्रमुखाने नियमावली पाळण्याबाबत सांगण्यात आले. मात्र अनेक विभागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत आहे. काही विभागातील कर्मचारी मास्क, ओळखपत्र वापरत नाहीत.
कार्यालयाच्या आवारात कर्मचारी विनामास्क फिरत आहेत. मंगळवारी दोन महिला कर्मचारी विनामास्क फिरत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर डॉ. आठल्ये यांनी कडक भूमिका घेतली असून यापुढे कर्मचारी विनामास्क आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला.
जिल्हा परिषदेत करोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार औषध फवारणी केली जात आहे. मास्क आणि ओळखपत्राचे बंधन आहे. प्रवेश करताना संबंधितांची नोंद ठेवली जात आहे. आवश्यक काम असेल तरच नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. तरीही अनेक कर्मचाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. यापुढे नियमावली न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
– मनोज जाधव
(उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा)