मंचर – अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठवेलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी घरची माणसे, मजूर घेऊन शेतात आरणीत ठेवलेल्या कांद्याची योग्य निवड करून कांदा चाळीत साठविण्यास सुरुवात केली आहे.
घोडेगांव, शिनोली, पोखरकरवाडी, डिंभे, लांडेवाडी, लौकी, चांडोली आदी गावांत विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला आहे. अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आणि शेतात उघड्यावर असलेला आरणीतील कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा पीक देखील या पावसाने खराब होण्याची शक्यता आहे.
पावसाने कांदा भिजून वाया जाऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांनी घरची माणसे, मजूर घेऊन शेतात आरणीत ठेवलेल्या कांद्याची निवड करून कांदा चाळीत साठविण्यास सुरुवात केली आहे. उत्पादित झालेला माल लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद असल्याने 6 ते 8 प्रतीकिलो दराने कांद्याची विक्री सुरू आहे.