कळंबमधील घटनेचा शेतकऱ्यांकडून संताप
मंचर (प्रतिनिधी) – कळंब येथील शेतकरी सुरेश खंडू वर्पे यांच्या दीड एकर क्षेत्रातील कलिंगड पिकाचे अज्ञात समाजकंटकांनी नुकसान केले आहे. अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कळंब ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वर्पेमळा येथे शेतकरी सुरेश वर्पे यांच्या दीड एकर क्षेत्रातील काही कलिंगडे अज्ञात व्यक्तींनी अर्धवट कापलेली आहेत. अंदाजे आठ ते दहा टन कलिंगड मालाचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी शेतकरी सुरेश खंडू वर्पे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिल्लक असलेला कलिंगडाचा बाग उपसून टाकला आहे.
अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी सुरेश वर्पे यांचा मुलगा मनोज वर्पे यांनी दिली. करोना विषाणूमुळे मंचर पोलीस बंदोबस्तात गुंतलेले असल्यामुळे विनाकारण पोलिसांना त्रास नको. या उद्देशाने त्यांनी या घटनेची तक्रार मंचर पोलीस ठाण्यामध्ये केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.