चांदा – नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक उभ्या पिकांचे नुकसान झाले. ऊसतोडणी मजुरांच्या कोप्यात पाणी शिरले.
सलग तीन ते चार दिवसांपासून चांदा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तुरी पूर्णपणे झोपल्या. गहू, हरबरा, कांद्याचे पीक वाया गेले. कपाशीच्या वाती झाल्या. त्यामुळे शेतकरी या अवकाळी पावसाने अर्थिक अडचणीत सापडला आहे.
चांदा रस्तापूर शिवारातील ग.न.२३७ व २३८ मधील प्रगतशील शेतकरी रमेश त्रिंबक दहातोंडे यांच्या शेतात मागील वर्षी गव्हाचे व कपाशीचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचा शासन स्तरावर पंचनामा झाला होता पण नुकसानभरपाई शासनाने देण्यास टाळाटाळ केल्याचे दहातोंडे यांनी सांगितले. ऊसतोडणी मजुरांच्या कोप्यात पाणी शिरले. ऊसतोडणीला जाव तर थळात पाणी, कोप्यात जाव तर तिथे ही दारात पाणी यामुळे तोडणी कामगारांचे खूप हाल झाले. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.