रूफचे झाले प्रचंड नुकसान
पुणे – नवी मुंबईतील सर्वांग सुंदर रचना असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे धुव्वॉंधार पावसाने तसेच वादळी वाऱ्यांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यात देखण्या कॅन्टिलिव्हर रूफ देखील वादळी पावसाच्या तडाख्यात सापडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही देशातील एका अप्रतिम रचना असलेल्या मैदानाची वाताहत झाल्याने क्रीडाशौकिनांनी खेद व्यक्त केला आहे.
मुंबईत सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या मैदानाला ग्रहण लागले. रुफ तसेच अन्य अद्ययावत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळीवाऱ्यांसह आलेल्या जोरदार पावसाने स्टॅंडवरील अच्छादनही उडून रस्त्यावर आले होते. क्रीडाशौकिनांनी या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे.
एकेकाळी भारतीय क्रिकेटसाठी नवे व अद्ययावत केंद्र अशी सार्थ ओळख असलेल्या या मैदानाची बांधणी 2008 साली पूर्ण झाली. आकर्षक मुख्य प्रवेशद्वार, परदेशी मैदानांप्रमाणे अत्यंत नियोजनबद्ध करण्यात आलेले बांधकाम तसेच अत्याधुनिक रूफ (छप्पर) यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे रूफ जर्मनीवरून मागविण्यात आली होती. पॅव्हेलियनजवळ लक्झरी सुट तसेच 60 कार्पोरेट बॉक्सही होते त्यांचेही पावसामुळे नुकसान झाले आहे.
2008 व 2010 साली आयपीएल स्पर्धेतील साखळी सामन्यांसह अंतिम सामन्यांचेही आयोजन येथे करण्यात आले होते. त्यानंतर या मैदानावर होणारे क्रिकेटचे सामने बंद झाले व नंतर फुटबॉलसाठी देशातील एक अग्रगण्य मैदान अशी या मैदानाची ओळख निर्माण झाली होती. हे मैदान मुंबई सीटी फुटबॉल क्लबचे घरचे मैदान बनले. जवळपास 55 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर क्रिकेट व फुटबॉलसह अन्य खेळांच्या सरावासाठीही सुविधा आहेत. त्यात टेनिससाठी 9 हार्ड कोर्ट आहेत.
इनडोअर बॅडमिंटनसाठी 4 कोर्ट आहेत. तसेच नर्सरी मैदानाजवळच ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलावही आहे. परदेशातील विविध बांधकामांसाठी प्रसिद्ध असलेल्या हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी या मैदानाची बांधणी केली असून जेव्हा हे मैदान सज्ज झाले त्याचवेळी बीसीसीआयने या मैदानाला आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीचे केंद्र अशी मान्यताही दिली होती. याच मैदानावर फिफा 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वकरंडकाचेही सामने रंगले होते. तसेच इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचेही सामने येथे सातत्याने होतात. 2009 साली याच मैदानावर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील होणारा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला होता.
जस्टिन बिबरच्या शोमुळे परदेशातही चर्चा
भारतात प्रथमच आलेला कॅनडाचा प्रसिद्ध गीतकार व गायक जस्टिन बिबर याचाही कार्यक्रम याच मैदानावर झाला होता. त्यानंतर जगभरात या मैदानावरील सुविधांचे कौतुक झाले होते. त्यानंतर अदनान सामीसह अनेक कलाकारांनी याच मैदानावर कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरत रसिकांना आनंद दिला होता. वादळी पावसामुळे या मैदानाची झालेली अवस्था पाहून सोशल मीडियावर अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.