नवी दिल्ली – अंगणवाडी आणि आशा या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी शुक्रवारपासून दोन दिवस संपावर आहेत. यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार मुके तर होतेच. परंतु, आता आंधळे आणि बहिरेही झाले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, आशा कर्मचारी देशभरातील घराघरापर्यंत आरोग्य सुविधा पोहचवतात. ते खऱ्या अर्थाने आरोग्य वॉरियर्स आहेत. परंतु, त्यांनाच आज आपल्या हक्कांसाठी लढावे लागत आहे. सरकार मुके तर होतेच. परंतु, आता आंधळे आणि बहिरेही झाले आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, दोन दिवसाच्या काळात जेलभरो सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. या संपाला इंटक, आयटक यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. करोनाच्या काळात या कर्मचाऱ्यांना खडतर परिस्थितीत काम करावे लागत असूनही त्यांना सुरक्षितता आणि भत्ते नाहीत. त्यांच्या पगाराची बरीच थकबाकी आहे. तसेच पगार वाढीची मागणी करण्यात आली आहे.