नवी दिल्ली : मंडूस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची मामल्लापुरम किनारपट्टी ओलांडली आहे. सध्या हे चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच संध्याकाळपर्यंत या वाऱ्यांची गती मंदावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मंडूस चक्रीवादळामुळे चेन्नईसह तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे चेन्नईच्या पट्टीपक्कम आणि अरुंबक्कम भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याशिवाय आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही मध्यम ते मुसळधार पावसाने नुकसान केले आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
तामिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेशातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या वादळामुळे आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पासून होण्याची शक्यता आहे.