प्रकाश राजेघाटगे
गांधीग्राम उभारण्याचा मानस
महात्मा गांधींचे विचार पुढे नेण्याचे काम जीवन इंगळे करत असून राजापूर येथील महादेव दरा येथे गांधीग्राम उभारण्याचा त्यांचा मानस आहे. ते स्वतःच्या मालकीच्या दोन एकर जागेत ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. गांधीजींच्या आदर्श गाव संकल्पनेवर आधारीत हे गांधीग्राम असेल.
बुध – पर्यावरण संवर्धन आणि पुस्तक वाचन या दोन विषयांसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या आणि वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवणाऱ्या सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन इंगळे (वय 66) यांनी सायकलवारी करताना दहा वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत दोन हजार पुस्तकांच्या माध्यमातून 86 वर्षांपर्यंतच्या लोकांना वाचनाचा आनंद दिला आहे. महाराष्ट्रातील खेडोपाड्यातील लोकांनी वाचन करावे, यासाठी झटणाऱ्या इंगळे यांचा हा प्रवास आणि फिरते वाचनालय प्रेरणादायी ठरले आहे.
खटाव तालुक्यातील बुध येथील जीवन इंगळे यांचे वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये होते. आयुष्यातील बरीच वर्ष शेती केल्यानंतर वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार जीवन इंगळे यांनी केला. राज्यातील नागरिकांना वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांनी फिरते वाचनालय सुरू केले. सुरुवातीला पंचक्रोशी, मग खटाव तालुका आणि त्यानंतर सातारा जिल्हा, असा इंगळे यांचा प्रवास सुरू झाला. कालांतराने इंगळे यांनी नागपूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र असे दौरे करून लोकांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
या काळात त्यांनी स्वतः दोन हजारांहून अधिक पुस्तकांचा संचय केला. महाराष्ट्रावर प्रभाव पाडलेल्या व्यक्तींची चरित्रे, ललित साहित्य, कादंबरी, कवितासंग्रह, बालसाहित्याची पुस्तके गावोगावी फिरून त्यांनी नागरिकांना वाचायला दिली. म्हणूनच आजही जीवनकाका गावात आले की, त्यांच्या भोवती लहानथोरांचा घोळका जमतो. इंगळे हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन गावोगावी फिरतात. सायकलवर त्यांचे विशेष प्रेम आहे.
सायकल चालवल्याने शरीर सुदृढ राहते, म्हणून इंगळे रोज दहा किलोमीटर सायकल चालवतात. पर्यावरण आणि वाचन प्रसारासाठी शेकडो कार्यक्रम इंगळे यांनी गेल्या दहा वर्षांत केले आहेत. या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत; पण लोक भेटून पुस्तके मागतात, त्यावेळी पुरस्कार मिळाल्यासारखे वाटते, अशी भावना इंगळे व्यक्त करतात.
आजच्या काळात वाचन सर्वात महत्त्वाचे आहे. लोकांनी व्यासंग वाढवल्यास समाज अधिक सुदृढ होईल. त्यासाठी यापुढेही कार्यरत राहणार आहे. खेड्यापाड्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा ध्यास आहे. त्या शिवाय पर्यावरण संवर्धनाकरिताही ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत.
जीवन इंगळे