पुणे – राज्य शिक्षण मंडळाची वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थी, पालकांना इयत्ता दहावीचा निकाल तत्काळ पाहण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. वेबसाइट क्रॅश झाल्याच्या प्रकरणाची विशेष समितीमार्फत सखोल चौकशी व तपासणी सुरूच आहे. सायबर हल्ल्यामुळेच ही वेबसाइट क्रॅश झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मंडळाने दि.16 जुलै रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा मंडळाने केली होती. पण, दिवसभर सर्व्हर डाऊन आणि वेबसाइट क्रॅश झाल्याने निकाल वेळेत मिळालेच नव्हते. सायंकाळनंतर वेबसाइट थोडी सुरळीत झाल्याने काही जणांना निकाल पाहता आले, तर काहींना दुसऱ्या दिवसाचीच वाट पाहवी लागली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. समितीने मंडळातील अधिकाऱ्यांकडून माहितीही घेतली आहे. तर्कवितर्क लावून समिती चाचपणी करत आहे. अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपून महिना झाला, तरी शासनाकडे अहवाल सादर झालेला नाही.
परीक्षार्थी 13 लाख, व्हिजिटर्स साडेतीन कोटी!
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी तेरा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. बारावीचा निकाल पाहण्यासाठी काही अडचणी आल्या नाहीत. काही तासांत तब्बल साडेतीन कोटी जणांनी वेबसाइटला भेट दिल्याचा प्रकार उघड झाला होता. विद्यार्थी संख्येच्या कितीतरी पटीने जास्त लोकांनी वेबसाइट का व कशासाठी पाहिली? असे आश्चर्यकारक प्रश्न निर्माण होत आहेत.
यावरून सायबर हल्ला झाल्यानेच दहावीच्या निकालाच्या वेळी वेबसाइट क्रॅश झाली असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वीही काही संस्थांच्या विविध परीक्षांदरम्यान सायबर हल्ल्यामुळे वेबसाइटला अडथळा निर्माण झाल्याचे उघड झालेले आहे.
राज्य शिक्षण मंडळाची वेबसाइट कशामुळे क्रॅश झाली, याची चौकशी सुरू आहे. सायबर हल्ला झाला, की इतर काही कारणांमुळे वेबसाइटला अडचण निर्माण झाली, याबाबत अजूनही तपासाचे कामकाज सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच खरे कारण समजू शकेल. समितीमार्फत शासनाकडे अंतिम अहवाल सादर करण्यास आणखी काही दिवस लागतील.
– विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त