World Cup 2023 India vs Sri Lanka Match Update : एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) यजमान भारत व श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. यंदाच्या स्पर्धेत सलग सहा सामने जिंकलेला भारतीय संघ या सामन्यासह विजयाची सप्तमी साकार करण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने सातत्याने वर्चस्व राखले आहे. सहापैकी एकाही लढतीत भारताचा संपूर्ण संघ बाद झालेला नाही.
भारत विरुद्ध श्रीलंका
वेळ – दुपारी 2 पासून
ठिकाण – वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
सलामीवीर कर्णधार रोहित शर्माने प्रत्येक सामन्यात धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे. त्याचाच लाभ घेत विराट कोहली, लोकेश राहुलसह अन्य सर्व फलंदाजांनीही तोडीस तोड खेळी करत संघाच्या विजयात हातभार लावला आहे. तसेच गोलंदाजीबाबत तर भारतीय संघाची एकेक अस्त्रे अचूक मारा करत आहेत.
प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, महंमद शमी तसेच फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा समोरच्या संघांना जेरीस आणत आहेत. त्यातच भारताने यंदाच्या स्पर्धेची उपांत्य फेरी या सामन्यापूर्वीच निश्चित केली असून, श्रीलंकेलाही नमवले तर 14 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेतील अव्वल स्थानही कायम राखेल.
दुसरीकडे श्रीलंका संघाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्यांनी सहा सामने खेळताना दोनच विजय मिळवले असल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यांचा संघ नवोदितांचा सघ असला तरीही पाथुम निसांका, कुशल मेंडीस व अँजेलो मॅथ्युज यांच्या जोरावर त्यांनी चमक दाखवली आहे.
अर्थात त्याचे विजयात रुपांतर करण्यात त्यांना यश आलेले नसले तरीही ते उर्वरित लढतींमध्ये एखाद्या बलाढ्य संघाला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीचे गणित बिघडवू शकतात. त्यांना त्यांचा प्रमुख फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगाची उणीव सातत्याने जाणवत आहे. बाकी गोलंदाज चांगली कामगिरी करत असले तरीही त्याचा संघाला विशेष लाभ झालेला नाही. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघाचीच बाजू वरचढ राहणार आहे.
गत कामगिरीवरून सिराज की पंड्या…
अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीतून पूर्ण बरा झालेला आहे हे सकाळी सामन्यापूर्वी जाहीर केले जाणार आहे. त्यातच आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महंमद सिराजने श्रीलंकेची केलेली वाताहत पाहता त्याचे संघातील स्थान कायम राहील असे वाटत असले तरीही पंड्या जर मॅचफिट ठरला तर सिराजला खेळवायचे की पंड्याला, याचा निर्णय करणे रोहित शर्माला जड जाणार आहे. मात्र, पंड्या या स्पर्धेच्या साखळी लढतीतील नेदरलॅंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्याद्वारे संघात परतेल, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे सिराजचे स्थान कायम राहणार की त्याच्या जागी अन्य फलंदाज खेळवला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
लक्षवेधी
– कोहलीला सचिनच्या बरोबरीसाठी एका शतकाची गरज
– शुभमन गिलचे अपयश बोचणारे
– रोहितकडून सुरुवात सरस, मात्र मोठ्या खेळीची अपेक्षा
– अय्यर व सूर्यकुमारच्याही कामगिरीवर मदार
– बुमराह व शमीचे श्रीलंकेसमोर आव्हान
– कुलदीप व जडेजाही ठरू शकतात धोकादायक
– धावगती वाढवण्याची भारताला संधी
खेळपट्टी नव्हे, धावांचे कोठार
मुंबईची खेळपट्टी ही सातत्याने फलंदाजांना मदत करणारी ठरली आहे. त्यातच नव्या चेंडूमुळे थोडा स्विंगही मिळेल. मात्र, जसा सामना पुढे जाईल तशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजीलाही मदत करेल. मुख्य म्हणजे लाल मातीचाही खेळपट्टी इतिहास पाहिला तर धावांचे कोठार ठरणारीच आहे. त्यामुळे सामना मोठ्या धावसंख्येचा होणार, असाच अंदाज आहे.
फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध
मुंबईतील हवेचा दर्जा खालावल्याचा अहवाल जाहीर झाल्यामुळे बीसीसीआयने या सामन्यादरम्यान तसेच सामना संपल्यावरही फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी घातली आहे. मैदान व परिसरात याबाबतच्या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.